नवी दिल्ली – पुढील लोकसभा निवडणुकीत विरोधकांमध्ये एकजूट घडवून आणण्याचे प्रयत्न काही नेत्यांनी सुरू केले आहेत. त्या प्रयत्नांना तरूणाईच्या जवळिकीने बळ मिळू शकते. कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी ( Rahul Gandhi ), शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यातील सलोखा विरोधकांना एकत्र आणण्याचे लक्ष्य गाठण्यात महत्वाची कामगिरी करू शकतो.
गुजरातचा निकाल चकित करणारा असेल – अशोक गेहलोत
मोठी राजकीय शक्ती बनलेल्या भाजपचा ताकदीने सामना करण्यासाठी एकत्र येण्याची गरज असल्याचे विरोधकांनी जाणले आहे. त्यातून विरोधकांच्या गोटातून सातत्याने एकवटण्याचा सूर आळवला जात आहे. विरोधी पक्षांच्या काही नेत्यांनी त्या दिशेने प्रयत्न सुरू केल्याचे याआधीच दिसून आले आहे. पण, पुढील लोकसभा निवडणुकीला अद्याप दीड वर्षाचा अवधी असल्याने त्या प्रयत्नांना फारसा वेग आल्याचे आढळत नाही.
पुढील महिन्यात गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत. त्या निकालांनंतर विरोधक ऐक्याच्या हालचाली गतिमान बनण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकजूट होण्याआधी विरोधकांच्या गोटातील तरूण नेत्यांची जवळीक संभाव्य आघाडीला मूर्त रूप देण्यासाठी पायाभरणी ठरू शकते. राहुल ( Rahul Gandhi ) यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेने नुकतेच महाराष्ट्रातून मार्गक्रमण केले.
त्या यात्रेत आदित्यही सहभागी झाले. ती घडामोड राहुल ( Rahul Gandhi ) आणि आदित्य यांच्यात चांगले संबंध निर्माण होण्याची नांदी ठरू शकते. त्यातून ठाकरे गट, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचा समावेश असणारी महाविकास आघाडी आणखी भक्कम बनू शकते. राहुल आणि तेजस्वी यांच्यात चांगले बॉंडिंग असल्याचे वारंवार दिसून आले आहे.
आता तेच आदित्य आणि तेजस्वी यांच्याबाबतही होऊ शकते. आदित्य यांनी बिहारचा दौरा करून तेजस्वी यांची भेट घेणे ही महत्वाची राजकीय घडामोड मानावी लागेल. राहुल, आदित्य आणि तेजस्वी हे तिघेही प्रदीर्घ काळ राजकीय खेळी करू शकतात. साहजिकच, त्यांच्यातील जवळिकीने नवी राजकीय समीकरणे उदयास येऊ शकतात.