नवी दिल्ली – अतिशक्तीशाली लष्करी उपकरणे आणि राफेल विमानांच्या भारतीय हवाई दलातील समावेशामुळे भारत भविष्यातील कोणत्याही युध्दात विजय मिळवू शकेल, असा विश्वास एअर चिफ मार्शल आर. के. एस. भदौरिया यांनी व्यक्त केला. भारत आणि चीन यांच्यात सीमेवर असणाऱ्या तणावाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे मत व्यक्त केले.
आपल्या उत्तर सीमेवर सध्या प्रचंड अस्वस्थता आहे. तेथे युध्द नाही पण शांतताही नाही… राफेल विमानांसह चिनूक, अपाची या हेलिकॉप्टर्ससह नव्याने समाविष्ट केलेल्या विमानांमुळे भारतीय हवाई दलाची ताकद वाढली आहे, अशा शब्दात हवाई दल प्रमुखांनी सीमेवरील स्थितीचे वर्णन केले.
हिवाळ्यातही लडाख सीमेवर सैन्य तैनात करण्याच्या दृष्टीने उपकरणे आणि जवानांसाठी विशेष व्यवस्था उभारण्याचे कार्य वेगाने सुरू आहे, या पार्श्वभूमीवर हवाई दल प्रमुखांनी केलेल्या विधानाला हे महत्व आले आहे. प्रत्यक्ष ताबा रेषेवर दोन्ही देशाचे सुमारे 50 हजार सैनिक तैनात आहेत. त्यांना पाठबळ देण्यासाठी रणगाडे, दारूगोळा आणि क्षेपणास्त्रेही तैनात करण्यात आली आहेत.
भारताने सोनवारी प्रत्यक्ष ताबा रेषेवर ब्रम्होस, निर्भय आणि आकश ही क्षेपणास्त्रे तैनात केली आहेत. त्या पार्श्वभूमीवर हवाई दल प्रमुख भदौरिया म्हणाले, कोणत्याही आव्हानांचा सामना करण्यासाठी आमची सुरक्षा दले सज्ज आहेत. कोणत्याही आगळिकीला तोंड देण्यासाठी भारतीय हवाई दल सक्षम आहे. भविष्यातील युध्दात हवाई ताकद हीच महत्वाची ठरणार आहे.
राफेल विमानांचा समावेश भारतीय हवाई दलात करण्याच्या समारंभात संरक्षणमंत्री राजनाथसिंह म्हणाले होते, ही विमाने हवाई दलात दाखल झाल्यामुळे देशाच्या सार्वभौमत्वाकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्या देशांना मोठा आणि कडक संदेश गेला आहे. ही बाब उल्लेखनीय आहे.