कोल्हापूर – राधानगरी धरणात केवळ बारा दिवसांचा पाणीसाठा शिल्लक असून धरणात केवळ 0.90 टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहिला असल्याने राधानगरी धरणाने तळ गाठला आहे. त्यामुळे आता कोल्हापूर जिल्ह्यात पाणी टंचाईचे सावट अधिक गडद झाले आहे. हा पाणीसाठी 10 जूनपर्यंत वापरता येणार असल्याचे सिंचन भवनकडून मिळालेल्या आकडेवारीत म्हंटले आहे.
राधानगरी, काळम्मावाडी या धरणामुळे येथील पंचगंगा, दुधगंगा, आणि वारणा या नद्या बारमाही दुथडी भरून वाहत असतात. शिवाय लहान मोठ्या गावांमध्ये पिण्याच्या पाणी पाण्याची योजना झाल्यामुळे जिल्ह्यात पाणी टंचाई फारशी जाणवत नाही. त्याचबरोबर शहरामध्ये सुद्धा सुरळीत पाणी पुरवठा सुरू आहे. परंतु पन्हाळा, गगनबावडा आणि शाहूवाडी येथील अनेक वाडी वस्त्यांवर पाण्याचे स्त्रोत नसल्याने पाण्याची टंचाई भासत आहे. विशेष करून शाहूवाडी तालुक्यातील 40 हुन अधिक गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागल आहे.
पाणी अडविण्याच्या योग्य उपाय योजनांचा अभाव आणि प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळे या तालुक्यातील लोकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. सध्या राधानगरी धरणामध्ये 0.90 टीएमसी इतका पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षी आजच्याच दिवशी 2 टीएमसीहुन अधिक पाणीसाठा होता. कोल्हापूरमध्ये दरवर्षी जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत पाऊस लागतोच. पण आता केवळ साधारणतः 10 जून पर्यंत पुरेल इतका पाणीसाठी शिल्लक राहिला आहे. पण आता पाऊस लांबणीवर गेला तर पंचगंगा, दूधगंगा आणि वारणा नदीकाठी वसलेल्या गावांना सुद्धा पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.