बंगळुरू – कर्नाटक विधानसभेच्या 224 जागांसाठी आज मतदान झाले. या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी, कॉंग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दल या तीन्ही पक्षांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. भाजप सलग दुसऱ्यांदा सत्ता मिळेल या अपेक्षेने रिंगणात आहे तर कर्नाटकातील नियमानुसार दर पाच वर्षांनी सत्ताबदल होत असल्यामुळे आपल्याला संधी असल्याची अपेक्षा कॉंग्रेसला आहे. तर प्रदेशातील 61 पेक्षा जास्त जागांवर भक्कम स्थितीत असलेला धर्मनिरपेक्ष जनता दल या दोन्ही पक्षांचा खेळ बिघडवू शकतो असाही अंदाज आहे.
भाजपचे नेते आणि माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी आज सकाळीच मतदान केले. राज्यातील 75 ते 80 टक्के मतदार आपल्याला मतदान करतील असा दावा त्यांनी केला व भाजपच पूर्ण बहुमताने पुन्हा सत्तेवर येईल असा विश्वासही व्यक्त केला. 130 ते 135 जागांवर भाजप विजयी होईल असे भाकित त्यांनी केले आहे.
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनीही आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की यावेळी ज्या प्रकारचे प्रचार अभियान राबविण्यात आले त्यामुळे आपण प्रसन्न आहोत. नागरिकांनी घराबाहेर पडून कर्नाटकच्या विकासासाठी मतदान करावे असे आवाहन मी केले होते.
कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्याही कर्नाटकात प्रचारसभा झाल्या. राज्यात 40 टक्के कमिशन मुक्त सरकार स्थापन व्हावे यासाठी लोकांनी मोठ्या संख्येने मतदान करावे असे आवाहन त्यांनीही केले होते. महिलांना अधिकार, युवकांना रोजगार, गरिबांना प्रगतीची संधी अशी हमी त्यांनी कॉंग्रेस पक्षाकडून दिली आणि सत्ता परिवर्तनाचे कर्नाटकच्या मतदारांना आवाहन केले.
भाजप आणि कॉंग्रेस या दोन्ही पक्षांचा प्रचार फार हाय प्रोफाइल होता. भाजपचे स्टार अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही प्रचारात उडी घेतली होती. त्यांनी तब्बल 6 रोड शो केले. 19 प्रचार सभा घेतल्या आणि आपली पूर्ण ताकद लावली. राहुल गांधीही तब्बल 12 दिवस कर्नाटकात कॉंग्रेसच्या प्रचारासाठी तळ ठोकून होते.
कर्नाटकातील लिंगायत समाज हा प्रभावशाली समाज आहे. राज्यातील 80 ते 90 जागांचा निकाल फिरवण्याची ताकद या समाजाकडे आहे. याच समाजाचे एक नेते जगदीश शेट्टर यांनी निवडणुकीच्या तोंडावर तिकिट नाकारल्यामुळे भाजपला रामराम केला आणि कॉंग्रेसकडून ते रिंगणात उतरले. त्यामुळे लिंगायत समाजाची मते विभागली जातात की ती पुन्हा भाजपच्या पाठिशी राहतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. तसे जर झाले तर भाजपला मोठा हातभार यामुळे लागणार आहे.
जनता दलाचे कुमारस्वामी यांना पुन्हा एकदा किंगमेकरच्या भूमिकेत पाहावे लागू शकते त्याचे कारण कदाचित कोणत्या एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता नाही. कॉंग्रसने आम्ही जनता दलाची मदत घेणार नसल्याचे अगोदरच जाहीर केले आहे. त्यामुळे जर खरेच त्रिशंकु स्थिती उदभवली तर भाजप कुमारस्वामी यांची मदत घेऊन सरकार स्थापन करू शकतो. किंबहुना बिहारमध्ये जास्त जागा असतानाही त्यांनी नितीश कुमार यांना मुख्यमंत्री केले होते तसा प्रयोगही भाजपकडून कर्नाटकात केला जाऊ शकतो.
कॉंग्रेसला गटबाजीचा शाप आहे असे म्हणतात. कर्नाटकच्या निवडणुकीतही पक्षाचे दोन प्रबळ नेते सिध्दरामय्या आणि डि. के. शिवकुमार यांच्यातील सूप्त संघर्ष उफाळून आलेला दिसला. श्रेष्ठींनी वेळीच त्यात हस्तक्षेप केल्यामुळे दोन्ही नेते पुन्हा रांगेत उभे राहीले. तथापी, हे चित्र निकालानंतर तसेच राहणार का याची हमी कोणीही देऊ शकत नाही.
माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी आता नव्वदी ओलांडली आहे. त्यांचे उत्तराधिकारी म्हणून कुमारस्वामी यांनी स्वत:ला प्रस्थापित केले आहे. पण स्वबळावर त्यांना राज्यात आपली सत्ता आणता आलेली नाही. यंदाच्या निवडणुकीत त्यांना कुटुंबातील कलहाचाही सामना करावा लागला. त्यावर मात करत ते पुन्हा कर्नाटकच्या सत्तेच्या केंद्रस्थानी येतात का याचीही मतदारांना उत्सुकता आहे.