लातूर – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना चुकल्यासारखे वाटत असून, त्यांना आपली चूक लक्षात आली आहे. ज्या नेत्याकडे आपलाच पक्ष सांभाळण्याची क्षमता नाही, ज्या नेत्याच्या नेतृत्वामध्ये मुख्यमंत्री असताना त्याचे 50 आमदार निघून जातात. 12 खासदार देखील निघून जातात.
ते महाविकास आघाडीचे नेतृत्व करू शकत नाही, हे शरद पवारांना कळले असून, त्यांना चुकल्यासारखे वाटत असल्याची टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. लातूर येथे पत्रपरिषदेत ते बोलत होते.
यावेळी बोलताना बावनकुळे म्हणाले की, शरद पवार यांनी जो प्रयोग केला होता तो फसला आहे. तीन पक्षाचे नेतृत्व करत असताना कोणतेही नेतृत्व उभं राहिले नाही. याची त्यांना आता खंत वाटत असेल. त्यामुळे या तीन पक्षाची वज्रमूठ सैल झाली आहे. आता कोणत्याही प्रकारचे नेतृत्व नाही. तर विविध पक्षातील अनेक नेते आमच्या संपर्कात आहेत.
विशेष म्हणजे एकनाथ शिंदे या मर्द मराठ्यांच्या नेतृत्वात एवढे बदल झाले आहेत. पुढे निवडणुकीत नरेंद्र मोदी यांचे राज्यात वादळ येणे बाकी आहे. कर्नाटकात ते वादळ पाहायला मिळाले आहे. तसेच देवेंद्र फडणवीस यांची राज्यामध्ये गारपीट होणे बाकी आहे. त्यानंतर राज्यात होणारे बदल लक्षातच येणार नाहीत. कोण कुठे आहे हे कळणार देखील नाही, असेही बावनकुळे म्हणाले.
लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या बावनकुळे यांनी अनेक विषयांवर भाष्य केला आहे. राज्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात संघटनात्मक पातळीवर मोर्चे बांधणी सुरू आहे. येत्या काळामध्ये संघटनेतील अनेक पदाधिकाऱ्यांच्या फेरनियुक्त्या करण्यात येणार आहेत. काही बदलही करण्यात येणार आहेत.
येत्या निवडणुकीत शिवसेनेबरोबरच्या (शिंदे गट) युतीत निवडणुकीला कसे सामोरे जाता येईल याची रणनीती आखण्याचे काम सुरू आहे. बूथ सशक्तिकरण, युवा वॉरियरची टीम तयार करणे सुरु आहे. कार्यकर्त्यांना पक्षाची ध्येय धोरणे आणि सरकारने केलेल्या कामाची माहिती दिली जात आहे. ती लोकांपर्यंत पोहचवणे असे संघटनात्मक कामांची बांधणी केली जात आहे, असेही ते म्हणाले.