बुध -लॉकडाऊनमधील निर्बंध शिथिल झाल्यानंतर आपापल्या राज्यात जाण्याची परवानगी मिळूनही माहितीअभावी चालत निघालेल्या उत्तर प्रदेशातील 25 कामगारांना पुसेगाव पोलिसांनी मदतीचा हात दिला. त्यांच्या रहाण्याची, जेवणाची सोय आणि रेल्वे आरक्षणासाठी मदतही केली. पोलिसांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक होत आहे.
पुसेगाव पोलीस ठाण्यातील हवालदार सचिन जगताप रविवारी (दि. 10) पहाटे विसापूरहून गस्त घालून परतत असताना त्यांना 25 तरुण चालत निघाल्याचे दिसले. त्यांची चौकशी केली असता ते उत्तर प्रदेशातील असून घराच्या ओढीने चालत निघाल्याचे समजले. जगताप यांनी ही माहिती सपोनि विश्वजित घोडके यांना दिली. त्यानंतर या कामगारांना पोलीस ठाण्यात घेऊन यायची सूचना घोडके यांनी जगताप यांना दिली. हे कामगार पोलीस ठाण्यात यायला तयार नव्हते. त्यांची समजूत घालून, प्रसंगी दरडावून त्यांना पोलीस ठाण्यात आणले.
लॉकडाऊन सुरू झाल्यावर ठेकेदाराने कामगारांना त्यांच्या कामाचे पैसे देऊन पलायन केल्याचे आणि आणि पावणेदोन महिने काम नसल्याने मिळालेले पैसेही संपल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. रात्रभर चालून थकलेल्या कामगारांच्या चहा, नाश्त्याची सोय घोडके व कर्मचाऱ्यांनी केली. त्यांना धीर देत उत्तर प्रदेशात जाण्यासाठी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. त्याच वेळी भाजपचे पदाधिकारी भरत मुळे काही कामानिमित्त पोलीस ठाण्यात आले होते. त्यांनी तेथील घडामोडी पाहून कामगारांच्या निवाऱ्यासाठी शेतात शेड आणि इतर सुविधा उपलब्ध असल्याचे सांगितले.
पोलीसांनी लागलीच कामगारांच्या जेवणाची व्यवस्था केली. त्यांना पाच दिवस पुरेल इतके अन्नधान्य आणि चीजवस्तू देण्यात आल्या. घोडके, जगताप, सहाय्यक फौजदार आनंदराव जगताप, सचिन भिलारे यांनी या कामगारांना रेल्वे आरक्षणासाठी मदत केली. साताऱ्यातून मंगळवारी रवाना झालेल्या पहिल्याच रेल्वेने हे कामगार आपल्या घराकडे मार्गस्थ झाले.