सातार -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दावा केलेल्या शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षपदी पुरुषोत्तम जाधव यांची वर्णी लागली आहे. शिंदे गटाच्या शिवसेनेच्या जिल्हा कार्यकारिणीची बैठक उद्या शनिवारी उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई व कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत होत असून यावेळी जिल्ह्याची कार्यकारणी जाहीर केली जाणार आहे. यानिमित्ताने अनेकांचे प्रवेश होणार आहेत, अशी माहिती नूतन जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जिल्ह्याचे सुपुत्र असून जिल्ह्याच्या विकासासाठी ते भरघोस निधी निश्चितच देणार आहेत, असे जाधव यांनी स्पष्ट केले.
श्री. जाधव म्हणाले, “”सातारा, कोरेगाव व वाई या तीन विधानसभा मतदारसंघाच्या कार्यक्षेत्राची संघटनात्मक जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आली असून कराड दक्षिण, कराड उत्तर, पाटण या तीन मतदारसंघांची जबाबदारी जयवंत शेलार यांच्याकडे देण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याचे प्रलंबित प्रश्न, विकास योजनांसाठी सातत्याने पाठपुरावा करून ते विषय मार्गी लावण्यासाठी आमची धडपड आहे. शिंदे यांनी ही जबाबदारी दिली असून यानिमित्ताने पुन्हा एकदा कामाची संधी मिळाली आहे.” चंद्रकांत जाधव यांना संघटकपद दिले जाणार आहे
तर शरद कणसे यांच्याकडे जिल्हा संपर्कप्रमुखपदाची जबाबदारी देण्यात आली आहे, असे त्यांनी एका उत्तरात सांगितले. यापुढील काळात भाजप व शिवसेना युतीच पुढे जाणार असून हे संघटन मजबूत होणार आहे.
पुनर्वसन, सिंचन, रोजगार, तसेच पायाभूत सुविधांचे अनेक प्रश्न आहेत, जिल्ह्यात नवीन उद्योग आले पाहिजेत याकरिता उद्योग मंत्री उदय सामंत यांची नुकतीच भेट घेतल्याचे जाधव यांनी सांगितले. विकासाच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेससह इतर पक्षांतील कोणी आमच्याकडे येणार असेल तर अशा लोकांचे निश्चितच स्वागत करू, असे जाधव यांनी सांगितले.
उदयनराजे चांगले मित्र ः जाधव
पत्रकार परिषदेच्या दरम्यान दालनाच्या दुसऱ्या बाजूला खासदार उदयनराजे भोसले यांची बैठक सुरू होती. या दोघांनी एकेकाळी परस्परविरोधी लोकसभेची निवडणूक लढली. त्यांची आता वाटचाल कशी असणार या प्रश्नावर पुरुषोत्तम जाधव म्हणाले, “आम्ही दोघे समोरासमोर लढलो हा भूतकाळ होता. आता आम्ही एकाच युतीत असून एकमेकांचे चांगले मित्र आहोत. आमच्यात कोणताही वादविवाद नाही. आम्ही मिळून सातारा जिल्ह्यावर निश्चित शिवसेनेचा भगवा फडकवू, यात शंका नाही.’ एकनाथ शिंदे यांच्या सूचनेप्रमाणे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा योग्य निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.