औरंगाबाद – गोदावरी खोऱ्यातील पाण्याची तूट भरुन काढण्यासाठी कोकणातील समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात आणण्याकरीता निश्चितपणे प्रयत्न केला जाईल. वॉटरग्रीडच्या माध्यमातून जायकवाडी धरणातून पैठण तालुक्यातील गावांना शुध्द पाणीपुरवठा केला जाईल, अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली.
पैठण तालुक्यातील टाके डोणगाव-विहामांडवा-तुळजापूर रस्त्याच्या रुंदीकरणासह सुधारणा कामाचे भूमिपूजन चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.
अशोक चव्हाण म्हणाले, पैठण तालुक्यातील रस्ते, पुलांच्या कामासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. प्राधान्याने या तालुक्यासाठी निधी दिला जाईल. तसेच वारकऱ्यांच्या सोयीसाठी पैठण-पंढरपूर या पालखी मार्गाची दुरुस्ती केली जाईल.
तसेच या मार्गावरील गोदावरी नदीवर पुल बांधण्यासाठी अर्थसंकल्पात 20 कोटी रुपयांची तरतूद केली जाईल. याशिवाय पैठण प्राधिकरणाला अधिकचा निधी मिळून देण्यासाठीही निश्चित प्रयत्न केला जाईल, जेणेकरुन विकासाची उर्वरित कामे पूर्ण करता येतील, असे त्यांनी सांगितले.