मुंबई – भारताबरोबरच जागतिक पातळीवर माहिती तंत्रज्ञानाचा वापर वाढण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर भारतातील माहिती तंत्रज्ञान कंपन्यांनी चांगले ताळेबंद जाहीर केले आहेत आणि आगामी काळात महसूल वाढणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे निर्देशांक उच्च पातळीवर असूनही माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या शेअरची खरेदी चालू आहे. परिणामी शेअर बाजाराचे निर्देशांक मंगळवारी नव्या उच्चांकी पातळीवर गेले.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 209 अंकांनी वाढून 55,792 अंकांवर बंद झाला. विस्तारित पाया असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 51 अंकांनी वाढून 16,614 अंकांवर बंद झाला.
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील टीसीएस, इन्फोसिस, टेक महिंद्रा या कंपन्याबरोबरच नेस्ले, टायटन, हिंदुस्तान युनिलिव्हर या कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली. तर इंडसइंड बॅंक, एनटीपीसी, भारती एअरटेल, टाटा स्टील या कंपन्यांना विक्रीचा मारा सहन करावा लागला.
मुख्य निर्देशांक मोठ्या प्रमाणात वाढत असले तरी शेअर बाजारात अस्थिरता कायम आहे. त्याचा फटका छोट्या कंपन्यांना बसत असून मिड कॅप आणि स्मॉल कॅप पिछाडीवर आहेत. आशियाई आणि युरोपातील शेअर बाजाराचे निर्देशांक घसरत असताना भारतीय शेअर बाजारातील मुख्य निर्देशांक मात्र वाढतच आहेत.
याअगोदरच रिझर्व्ह बॅंकेने शेअर बाजार निर्देशांक आवश्यकतेपेक्षा जास्त वाढत असल्याबद्दल चिंता व्यक्त केलेली आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये गुंतवणूकदार सावध राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. परदेशी संस्थागत गुंतवणूकदाराकडून विक्री चालू असून काल या गुंतवणूकदारांनी 1088 कोटी रुपयाच्या शेअरची विक्री केली.