लंडन – भारताने सोमवारी इंग्लंडचा 151 धावांनी पराभव करत पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी भक्कम आघाडी घेतली. जागतिक क्रिकेटची पंढरी मानल्या जात असलेल्या ऐतिहासिक लॉर्डस मैदानावर भारतीय गोलंदाजांनी सोमवारी इंग्लंडच्या नावाजलेल्या फलंदाजीला नेस्तनाबूत केले व विजयाची मुहुर्तमेढ रोवली.
विजयासाठी 272 धावांचे आव्हान घेत मैदानात उतरलेल्या इंग्लंडच्या दिग्गज फलंदाजांवर वर्चस्व राखत भारतीय संघाने लॉर्डसवर कसोटी विजय साकार केला. जसप्रीत बुमराह, महंमद सिराज, महंमद शमी व इशांत शर्मा यांनी आपले काम चोख बजावले. इंग्लंडचा कर्णधार ज्यो रूट याचा अडथळा बुमराहने दूर केला आणि भारतीय संघाला विजयाची चाहुल लागली. त्यावेळी इंग्लंडचा संघ धावांचे शतक तरी गाठेल का असा प्रश्न निर्माण झाला होता.
मात्र, जोस बटलरने मोईन अलीला साथीला घेत किल्ला लढवला. बटलरने तब्बल 96 चेंडू खेळून काढताना भारताचा विजय लांबवला. मात्र, राउंड द विकेट गोलंदाजी करताना सिराजने इंग्लंडच्या फलंदाजीला खिंडार पाडले. भारतानेही अवांतर 29 धावांची खिरापत वाटली. अखेर या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडचा पराभव करत पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.
तत्पूर्वी महंमद शमीने फटकावलेले अर्धशतक व त्याला जसप्रीत बुमराहने दिलेली योग्य साथ यांच्या रूपाने भारताच्या शेपटाने यजमान इंग्लंडला तडाखा दिला व दुसऱ्या कसोटी सामन्यात विजयाची संधी निर्माण केली. कर्णधार विराट कोहलीने 8 बाद 298 धावांवर दुसरा डाव घोषित केला व इंग्लंडसमोर विजयासाठी 272 धावा करण्याचे आव्हान ठेवले.
रविवारी इंग्लंडचा पहिला डाव 391 धावांवर रोखत भारताने आपला दुसरा डाव सुरू केला. पहिल्या डावातील 27 धावांची आघाडी पूर्ण करत इंग्लंडसमोर आव्हान ठेवण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारताच्या सलामीवीरांनी निराशा केली. पहिल्या डावातील शतकवीर लोकेश राहुल, रोहित शर्मा व कर्णधार कोहली हे लवकर बाद झाले व संघाची 3 बाद 55 अशी बिकट स्थिती झाली. त्याचवेळी चेतेश्वर पुजाराने अजिंक्य रहाणेला साथीला घेत संघाचा डाव सावरताना चौथ्या गड्यासाठी शतकी भागीदारी केली व संघाला दीडशतकी मजल मारून दिली.
पुजारा अर्धशतक मात्र पूर्ण करू शकला नाही. रहाणेने या मालिकेतील पहिलेच अर्धशतक पूर्ण करताना 61 धावांची खेळी केली. त्यानंतर तोदेखील बाद झाला; तसेच रवींद्र जडेजाही परतला. ऋषभ पंत व इशांत शर्मा यांनी थोडी चमक दाखवली. मात्र, हे दोघेही बाद झाले तेव्हा संघाच्या 8 बाद 209 धावा झाल्या होत्या व केवळ 173 धावांची आघाडी हाती होती.
त्याचवेळी महंमद शमी व जसप्रीत बुमराह यांची जोडी जमली व त्यांनी 9 व्या गड्यासाठी 90 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली व संघाला बळकटी प्राप्त करून दिली. शमीने इंग्लंडच्या गोलंदाजीवर आक्रमण करताना दमदार अर्धशतकी खेळी केली. त्याला सुरेख साथ देताना बुमराहने 34 धावांची खेळी केली.
शमीने आपल्या 56 धावांच्या खेळीत 70 चेंडूंचा सामना करताना 6 चौकार व 1 षटकार अशी फटकेबाजी केली. त्यावेळी कोहलीने दुसरा डाव घोषित केला व यजमानांसमोर विजयासाठी 272 धावा करण्याचे आव्हान ठेवले. इंग्लंडकडून मार्क वुडने 3, तर ओली रॉबिन्सन आणि मोईन अलीने प्रत्येकी 2 गडी बाद केले.
दरम्यान, हा सामना रोमहर्षक अवस्थेत आल्यानंतर इंग्लंडच्या खेळाडूंचा संयम सुटला व त्यांनी जसप्रीत बुमराहला उद्देशून स्लेजिंग केले. त्याचवेळी मार्क वुडने बुमराहला उसळता चेंडू टाकला त्यावर बुमराह अडखळला तरीही त्याला चेंडू लागला आहे हे तसेच तो ठीक आहे का हे पाहण्याचे सौजन्यही त्यांनी दाखवले नाही.
हा सगळा प्रकार पाहून कर्णधार कोहली ड्रेसिंगरूममधून संताप व्यक्त करत होता. त्याने इंग्लंडच्या खेळाडूंना उद्देशून अपशब्दही वापरल्याचे सांगितले जात आहे. मात्र, याबाबत अद्याप काहीही स्पष्ट झालेले नाही. मार्क वुड, जोस बटलर, कर्णधार ज्यो रूट यांनी बुमराहला डिवचल्याचे स्पष्ट दिसले. त्यातही खुद्द रूटने हा प्रकार केल्यामुळे इंग्लिश चाहते त्याच्यावरच नाराज झाले.
संक्षिप्त धावफलक –
भारत पहिला डाव – सर्वबाद 364. इंग्लंड पहिला डाव – सर्वबाद 391. भारत दुसरा डाव – 109.3 षटकांत 8 बाद 298 धावा. (अजिंक्य रहाणे 61, चेतेश्वर पुजारा 45, महंमद शमी नाबाद 56, जसप्रीत बुमराह नाबाद 34, मार्क वुड 3-51, ओली रॉबिन्सन 2-45, मोईन अली 2-84). इंग्लंड दुसरा डाव – 51.5 षटकांत सर्वबाद 120 धावा. (ज्यो रूट 33, जोस बटलर 25, मोईन अली 13, महंमद सिराज 4-32, जसप्रीत बुमराह 3-33, इशांत शर्मा 2-13, महंमद शमी 1-13).