मुंबई – विविध राज्यातील निर्बंध कमी होत आहेत. त्यामुळे रिटेल क्षेत्रात विक्री वाढत आहे. जुलै महिन्यामध्ये रिटेल क्षेत्रातील विक्री करोनापूर्व काळाच्या 72 टक्क्यावर आली आहे. त्यामुळे आगामी उत्सवाच्या काळात विक्री वाढेल असे दुकानदारांना वाटत आहे.
रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडियाने या संदर्भात माहिती जारी केली आहे. जून महिन्यामध्ये झालेली विक्री करोना पूर्व काळाच्या 50 टक्के होती. जुलै महिन्यात ते 72 टक्क्यावर आली आहे. मात्र विविध भौगोलिक क्षेत्रात हे विक्रीचे प्रमाण वेगवेगळे आहे. पश्चिम भारतामध्ये अजूनही विक्री वाढलेली नसून जुलै महिन्यामध्ये ही विक्री करोनापूर्व काळाच्या 57 टक्क्यावर आहे.
महाराष्ट्रामध्ये फार उशिरा निर्बंध उठविण्यात आले. त्याचबरोबर गेल्याच आठवड्यामध्ये मॉल्स उघडण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे पश्चिम भारतात विक्री अजून वाढलेली नाही. हॉटेलमधील उलाढाल करोनापूर्व काळाच्या 97 टक्क्यावर आली आहे.
रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार राजगोपालन यांनी सांगितले की, आता मॉल उघडत असल्यामुळे आगामी काळामध्ये विक्री वाढण्याची शक्यता आहे. त्यांनी महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या मॉल उघडण्याच्या निर्णयाचे स्वागत केले.