काही पक्षांतील उमेदवारांचे गुडघ्याला बाशिंग
बेलसर – पुरंदर तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस व बाळासाहेबांची शिवसेना यांच्याकडून राजकीय आरोप प्रत्यारोपाने जोर धरला असून राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून खुल्या चर्चेचे आव्हान व माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांचा डीएनए चेक करण्याची गरज असल्याची वक्तव्य केली गेली. तर बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाकडून नेत्यांना घेऊन या चर्चा करू, अशा आशयाची वक्तव्य करण्यात आली. आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषदच्या निवडणुकीसाठी राजकीय फैरी जोडण्यास सुरुवात झाली आहे. राजकीय वातावरण तापण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे. तर तालुक्यात महाचर्चा होणार की नुसतीच टोलेबाजी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मागील काही दिवसांमध्ये पुरंदरचे राजकारण ढवळून निघाले आहे. कधी चर्चांना खुले आव्हान, तर कुठे पक्ष बांधण्यासाठी मजबूत बैठका, तर काही पक्षांचे आमदारकीचे उमेदवार हे घोषित करून वातावरण बदलण्याच्या तयारीला तालुक्यातील सर्वच पक्षीय नेते मंडळी लागले आहेत. पुरंदर तालुक्यामध्ये सध्या रंगत असलेले माजी सनदी अधिकारी संभाजी झेंडे आणि राज्याचे माजी जलसंपदा व जलसंधारण राज्यमंत्री तसेच पुरंदर तालुक्याचे माजी आमदार विजय शिवतारे यांच्यातील खुल्या चर्चांबद्दल आव्हानाची चर्चा चालू आहे.
पुरंदर तालुक्यात सध्या शिवतारे आणि झेंडे यांच्या आव्हानांची चर्चा चालू आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना संभाजी झेंडे यांनी विजय शिवतारे यांना खुल्या चर्चेचे आव्हान दिले होते. ते आव्हान शिवतारे यांनी शरद पवार व सुप्रिया सुळे यांना घेऊन येण्याची अट घालून स्वीकारले आहे. त्यामुळे सर्वच मतदार आणि नागरिकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आता खरंच नक्की चर्चा होणार का? कोठे होणार? कधी होणार? आणि कशी होणार? याबद्दल प्रत्येक नागरिक चर्चा करीत आहे.
तालुक्यात सध्या चालू असलेली परिस्थिती ही फक्त प्रसिद्धीसाठी की काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कुठल्याही प्रश्नाचे उत्तर राज्यकर्त्यांकडे आहे की नाही माहीत नाही.आरोप प्रत्यारोपांच्या वर्तुळामध्ये पुरंदर असाच गुरफटत राहणार का? की पुरंदरच्या हातात विकास दिला जाणार! तर राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या चर्चेमध्ये पुरंदरच्या विकासाचे प्रश्न मागे राहणार का? असे प्रश्न निर्माण होत आहेत.
गुंजवणी धरण अन् विमानतळाच्या घिरट्या
पुरंदर तालुका मागील अनेक वर्षांचा राजकारणाचा अभ्यास करता गुंजवणी धरण, विमानतळ आणि राष्ट्रीय बाजार याच्या भोवती केंद्रित केला गेला आहे; परंतु पुरंदरमधील नागरिकांना गुंजवणीच्या पाण्याची प्रतीक्षा अद्यापही करावी लागत आहे. तर विमानाच्या घिरट्या नक्की हवेत की जमिनीवर हेही कळायला मार्ग नाही. तर राष्ट्रीय बाजाराचे नक्की काय? हा डोक्यात गोंगावणारा नवीन प्रश्न नागरिकांना भेडसावत आहे. चर्चा नुसत्या राजकीय व्यासपीठावर होत आहेत. परंतु प्रत्यक्षात मतदारांच्या हातात काय मिळाले हा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.