तालुक्यातील तीन गावांचे सर्वेक्षण
पुणे – पुरंदर तालुक्यात प्रस्तावित असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी सात गावांतील नागरिकांचा विरोध होत असल्याने आता विमानतळासाठी पर्यायी जागेचा शोध सुरू करण्यात आला. त्यानुसार नव्याने सर्वेक्षण करण्यात आले असून यामध्ये पुरंदर तालुक्यातील पाच व बारामती तालुक्यांतील तीन गावांचा समावेश करण्यात आला आहे. या आठ गावांतील मिळून सुमारे 3 हजार 68 एकर जागेवर प्रस्तावित विमानतळ उभारता येऊ शकते असे संरक्षण मंत्रालयास कळविण्यात आले आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.
पुरंदर तालुक्यातील वनपुरी, उदाचीवाडी, कुंभारवळण, एखतपूर, मुंजेवाडी, खानवडी, पारगाव या सात गावांमधील 2 हजार 832 हेक्टर जागेवर आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. केंद्र आणि राज्य सरकार, तसेच एअरपोर्ट ऍथॉरिटी, संरक्षण मंत्रालयासह सर्व परवानग्या या जागेसाठी मिळाल्या आहेत. त्यासाठीची अधिसूचनासुद्धा प्रसिद्ध करून त्यावर शेतकऱ्यांच्या हरकती मागवल्या होत्या. मात्र, या सातही गावांतील गावकऱ्यांनी विमानतळास विरोध दर्शविला होता. यासंदर्भात मध्यंतरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पर्यायी जागांचा विचार करावा, अशा सूचना प्रशासनाला दिल्या होत्या. दरम्यान, माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि आमदार संजय
जगताप यांनी दिल्लीत जाऊन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली होती. त्यावेळी सिंह यांनीदेखील पर्यायी जागेचा विचार करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार सध्या निश्चित केलेल्या जागेपासून पूर्वच्या दिशेला दहा ते पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या पर्यायी जागेचे सर्वेक्षण मध्यंतरी एका खासगी संस्थेकडून करून घेण्यात आले आहे.
विमानतळासाठी या गावांचे सर्वेक्षण
पुरंदर तालुक्यातील रिसे, पिसे, पांडेश्वर, राजुरी आणि नायगाव या पाच गावांतील आणि बारामती तालुक्यातील भोंडवेवाडी, चांदगुडेवाडी आणि आंबी खुर्द या तीन गावांचे सर्वेक्षण करण्यात आले.