नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यात काही शेतकऱ्यांनी त्यांचा ताफा अडवल्याच्या घटनेवरून राजकारण तापलं आहे. पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेत मुद्दाम त्रुटी ठेवल्याचा आरोप भाजपने काँग्रेसवर केला आहे. तर काँग्रेसने भाजपवर हल्लाबोल केला आहे. त्यातच आता काँग्रेसचे पंजाबचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांनी थेट मोदींवर हल्लाबोल केला.
नवजोत सिंग सिद्धू यांनी एका पत्रकार परिषदेत भाजप आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधून अनेक आरोप केले. ते म्हणाले की, काँग्रेसचा कार्यकर्ते आणि पंजाबमधील प्रत्येक व्यक्ती देशाच्या सुरक्षेसाठी जीव देण्यास तयार असतो. मोदीजी तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात. भारतीय जनता पक्षाचे नाही. त्यामुळे तुमच्या आयुष्याची किंमत ही भारतातील प्रत्येकाला असल्याचं सिद्धू यांनी म्हटलं.
पंतप्रधान मोदींनी जो आरोप की त्यांच्या जीवाला पंजाबमधील जानतेकडून धोका आहे, तो अत्यंत चुकीचा आहे. कारण जेवढे तिरंगे मोदींनी आणि त्यांच्या पक्षाने फडकावले नसतील तेवढ्या तिरंग्यामध्ये गुंडाळून पंजाबचे सुपुत्र शहीद झाले आहेत, असंही सिद्धू म्हणाले.
पंजाबमधील ६० टक्के शेतकरी तुमच्याविरुद्ध उभे राहू शकतात. पण मी हे मान्य करू शकत नाही, की हे शेतकरी हिंसक असतील किंवा यांच्यामुळे तुम्हाला धोका निर्माण होईल. त्यामुळे मोदींनी पंजाबमधील जनतेकडून त्यांच्या जीवाला धोका आहे असं म्हणणे आमच्या नावाला काळं फासण्यासारखं आहे . त्यामुळे पंजाबला बदनाम करून शेवटच्या एका महिन्यात उर्वरित राज्यातील निवडणुका लढू नका असा इशारा सिद्धू यांनी पंतप्रधान मोदींना दिला आहे.