आळंदी – मराठी पत्रकार दिनानिमित्त श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे शरदचंद्र पवार कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या वतीने आळंदी शहरातील विविध वर्तमानपत्रांसह न्यूज पोर्टलच्या पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील म्हणाले, “पत्रकारिता हे सतीचे वाण आहे. प्रसार माध्यमे ही समाजाचा आरसा असतात. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी वाचन संस्कृतीचे जतन झाले पाहिजे. यासाठी सर्वानी वृतपत्रे वाचावीत. संपादकीय लेख वाचावेत. सोशल मीडियाचा वापर सावधगीरीने केला पाहिजे. समाजात द्वेश निर्माण करणारे, चुकीचे मेसेज पुढे पाठवू नये. पत्रकारीता पूर्वीसारखी राहिली नसून यात मोठे बदल झाले आहेत. डिजिटल मीडियामुळे या क्षेत्रात रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत”, असे मार्गदर्शन बुट्टे पाटील यांनी केले.
तसेच पिंपरी चिंचवड लोकमत आवृत्तीचे वरिष्ठ उपसंपादक हणमंत पाटील यांनीही विद्यार्थ्यांना पत्रकारिता क्षेत्राची माहिती देत मार्गदर्शन केले. प्राचार्य डाॅ. हंसराज थोरात यांनी पत्रकारांच्या कार्यावर प्रकाश टाकत समाजाला योग्य दिशा देणारे पत्रकार घडविण्यासाठी महाविद्यालयात पत्रकारितेच्या अभ्यासक्रमाचा समावेश करण्यात येणार असल्याचे सांगितेल.
यावेळी संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या सप्तशतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष (725) संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त दै. प्रभातमध्ये ‘ज्ञानदीप लावू जगी’ हे सदर वर्षभर प्रसिद्ध केल्याबाबत उपसंपादक ज्ञानेश्वर फड यांचा सन्मान करण्यात आला. तसेच ज्येष्ठ पत्रकार अर्जुन मेदनकर, सुनिल बटवाल, श्रीकांत बोरावके, भानुदास प-हाड, दिनेश कुऱ्हाडे, हमीद शेख, दादासाहेब कारंडे, अनिल जोगदंड, विठ्ठल शिंदे, गौतम पाटोळे, अमोल काकडे, गणेश शिंदे, हनुमान घोंगडे, रामदास दाभाडे यांचाही विविध विषयांवर उल्लेखणीय कार्याबद्दल सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य शरद बुट्टे पाटील, वरिष्ठ उपसंपादक हणमंत पाटील, प्राचार्य डॉ. हंसराज थोरात, उपप्राचार्य डॉ. पांडुरंग मिसाळ, भाजपा अध्यात्मिक आघाडी पुणे समन्वयक संजय घुंडरे पाटील, जेष्ठ पत्रकार अर्जुन मेदनकर यांचे हस्ते दीपप्रज्वलन, प्रतिमा पूजन करण्यात आले.
कार्यक्रमास महाविद्यालयाचे खजिनदार मयूर ढमाले यांचे विशेष सहकार्य मिळाले. यावेळी शरदचंद्र पवार महाविद्यालय व रामचंद्र पाटील औटी कनिष्ठ महाविद्यालयातील प्रा. प्रविण डोळस, ग्रंथालय विभाग प्रमुख तापकीर, यांचेसह विभाग प्रमुख शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, महाविद्यालयातील सर्व शाखेतील विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते. या वेळी प्रास्ताविकात सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. पांडुरंग मिसाळ यांनी पत्रकार दिनाचे आयोजन व पत्रकारांचा गौरव समारंभ यामागील संस्थेची संकल्पना, हेतू व उद्देश विशद केला. प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा. कैलास अस्तरकर यांनी करून दिला. सूत्रसंचालन, प्रा.दिलीप बारी यांनी केले. आभार प्रा. परमेश्वर भाताशे यांनी मानले. सामूहिक पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.