फुरसुंगी, दि. 28 (प्रतिनिधी) -फुरसुंगी-उरुळी देवाची कचरा डेपोबाधित घुलेवस्ती, गणेशनगर, उत्तमनगर, पॉवरहाऊस, रेल्वेस्टेशन या परिसरातील विहिरी, कुपनलिका असे हक्काचे जलस्त्रोत गेल्या 12 वर्षांत कायमचे दूषित झाले आहेत. या परिसरात भिषण पाणी टंचाई आहे. महापालिका समावेशानंतरही या गावांना अद्यापही पिण्याच्या पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. महापालिकेत गाव समावेशानंतर पाणी प्रश्न सुटेल, अशी अपेक्षा असताना याकडे पालिकेचे गेल्या कित्येक वर्षांपासून दुर्लक्ष आहे. महापालिकेने जून 2010 पासून उरुळी देवाची-फुरसुंगी कचरा डेपोत “ओपन डंपिंग बंद’ करून या भागाचा विकास करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, ते आश्वासनही कोरडेच ठरले आहे. या परिसरातील नागरिकांनी अनेक आंदोलने केल्यानंतरही पालिका प्रशासनाकडून पाणी पुरवठा योजना, पुरवठा याबाबत केवळ अश्वासनेच दिली जात आहेत.
कचरा डेपो परिसरातील नागरिक दुर्गंधी, डास, माशा, रोगराई, आरोग्यास घातक दुषित दुर्गंधीयुक्त काळेपाणी या त्रासामुळे नागरीक त्रस्त आहेत. महापालिकेकडून या भागात अद्याप कोणतीही ठोस विकासकामे करण्यात आलेली नाहीत. हा परीसर पालिकेकडून कायमच दुर्लक्षित राहिलेला आहे. यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे. महापालिका प्रशासनाने कचराडेपोबाधित भागाला पुरेसा व नियमित पाणीपुरवठा करून ठप्प विकासकामे सुरू करावीत, अशी मागणी नागरीकांनी केली आहे.
पाण्याचे टॅंकर “तिकडे’ जातात….
पाणी टंचाई असलेल्या परिसरातील नागरिक दिवसभर सर्व काम-व्यावसाय सोडून महापालिकेच्या पाण्याच्या टॅंकरची वाट पाहात असतात. परंतु, या भागातील हॉटेल्स, ढाबे, विविध कंपन्यांची गोदामे, कंपन्यांच्या टाक्या भरून देताना अधिक पैसे मिळतात म्हणून असे टॅंकर तिकडे जात आहेत. याच कारणातून टॅंकरचे पाणीही योग्य प्रमाणात उपलब्ध होत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.