पुणे – समाजासाठी काहीतरी करायचे असते म्हणून लोक राजकारणात येतात. पण हल्ली काही राजकारणी राजकारणालाच करिअर मानतात. चकचकीत कपडे घालून सदैव राजकारण करत राहतात. मात्र, तरुणांनी राजकारणात यायला घाबरता कामा नये. राजकारणातील पैशाचा प्रभाव संपवण्यासाठी राजकारणात या, असे आवाहन मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केले.
एमआयटी विश्वशांती विद्यापीठात आयोजित भारतीय छात्र संसद समारोप कार्यक्रमात चौहान बोलत होते. माजी सनदी अधिकारी आणि लोकसत्ता पक्षाचे अध्यक्ष जयप्रकाश नारायण, डॉ. स्वामी ज्ञानवत्सल, ज्येष्ठ संगणक तज्ज्ञ डॉ. विजय भटकर, एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. विश्वनाथ कराड, कार्याध्यक्ष प्रा. राहुल कराड, कुलगुरू डॉ.आर.एम. चिटणीस या वेळी उपस्थित होते.
चौहान यांनी तरुणांशी संवाद साधताना राजकारण काय केवळ चोरी करणाऱ्यांचे आहे का, निवडणुकीत आमदारकीसाठी ३५ ते ४० कोटी खर्च केल्यावर जनतेची सेवा काय करणार, असा सवालही त्यांनी केला आहे. चौहान म्हणाले, मुख्यमंत्री झाल्यावर लाडली लक्ष्मी योजनेमुळे गेल्या काही वर्षांत मध्य प्रदेशात मुलींची संख्या वाढली.
आज एक हजार मुलांमागे ९७६ मुली आहेत. मुलींनीच मला मामा म्हणायला सुरुवात केली. मला माझे आयुष्य सफल झाल्यासारखे वाटते. आता २२ जानेवारीला श्रीराम मंदिराचे उद्घाटन होणार आहे. त्यामुळे इतक्या वर्षांच्या संघर्षानंतर रामलल्ला येणार आहेत आणि रामराज्यही येणार आहे. डॉ. विश्वनाथ कराड यांनी मनोगत व्यक्त केले.
प्रेमाने मामा म्हणतात
आज मी माजी मुख्यमंत्री असलो, तरी नाकारला गेलेला नाही. आजही मध्य प्रदेशातील जनता प्रेमाने मला मामाच म्हणते. राजकारण केवळ पदासाठी नसते. मी राजकारणातून बाहेर पडलेलो नाही. अजून बरीच कामे बाकी आहेत, असे सूतोवाच शिवराजसिंह चौहान यांनी केले.
” भविष्यातले लोकनेते घडवण्यासाठी आणि युवा नेतृत्वाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा आणि स्कूल ऑफ गव्हर्नन्स स्थापन करण्यासाठी पाठिंबा द्यावा. चारित्र्यसंपन्न आणि उच्चशिक्षित नेतृत्व घडवण्यासाठी आता जाणीवपूर्वक प्रयत्नांची गरज आहे. भारतीय छात्र संसदेच्या निमित्ताने आम्ही एक पाऊल उचलले आहे.” -राहुल कराड, कार्याध्यक्ष : एमआयटी एमआयटी डब्ल्यूपीयू