पुणे – शाळा ही ज्ञान मंदिर असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी रोज नवनवीन गोष्टी शिकणे, नीटनेटकेपणा अंगीकारणे, वक्तशिरपणा आणि देश प्रेम असावे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या आंतरिक उर्जेचा वापर सकारात्मक गोष्टींसाठी करावा, असा सल्ला संत साहित्याचे अभ्यासक प्रा.डॉ. दत्तात्रय तापकीर यांनी दिला.
माईर्स एमआयटीतर्फे आयोजित वैश्विक मूल्याधिष्ठित शिक्षण आणि यशस्वी व्यक्तिमत्व विकास परीक्षा -२०२३ या राज्यस्तरीय प्रमाणपत्र परीक्षेत सुवर्णपदक विजेत्या सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्यांच्या सन्मान सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे, माईर्स एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक डॉ. विश्वनाथ कराड, माजी कुलगुरू डॉ.एस.एन.पठाण व डॉ.संजय उपाध्ये हे उपस्थित होते.
डॉ. विश्वनाथ कराड म्हणाले, विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात नुसता विचार करून चालणार नाही तर त्याला कृतिशीलतेची जोड देणे गरजचे आहे. ज्ञानाच्या शोधात बुद्धांनी सर्वस्व त्याग केला ही गोष्ट विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावी. विद्यार्थीदशेत भगवद् गीता, स्वामी विवेकानंद, श्यामची आई, टाकीचे घाव, या पुस्तकांचे वाचन करावे. जेणेकरून संघर्ष काय असतो हे कळेल. त्यातूनच जीवनाचा खरा शोध घेता येतो. डॉ. संजीव सोनवणे म्हणाले, नैतिक मूल्य सतत आपल्या कुटुंबात व अवती भवती वावरत असतात. त्याचा शोध घेऊन ते जीवनात उतरविल्यास व्यक्तीमत्व निर्माण होते आणि हे व्यक्तिमत्व आपल्या वर्तनातून दिसायला हवे.