पुणे –पुणे शहराचे पाणी कमी केले जाणार नसल्याची स्पष्टोक्ती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली. नदीतील पाणी स्वच्छ करून ते शेतीला देण्यासाठी “जायका’ कंपनी काम करणार आहे. यासाठीचे टेंडर पुणे महापालिका काढणार आहे. बहुतेक स्थायी समितीमध्ये एकमत झाले नसल्याने टेंडर काढले नसेल, असे सांगत पाटील यांनी पालिकेच्या कारभारावर टीकास्त्र सोडले.
बालगंधर्व येथे पाटबंधारे विभागाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पाटील म्हणाले, सिंचनासाठी पाण्याचा योग्य पद्धतीने वापर झाला पाहिजे. कालव्यातील पाण्याची गळती आणि दुरुस्ती केली तर वहनक्षमता वाढते आणि कालव्याच्या शेवटपर्यंत पाणी पोहचते. पुणे शहरात पाणीप्रश्नावरून मध्यंतरी चर्चा झाल्या होत्या. मात्र, पुणे शहराचे पाणी आम्ही कमी करू शकत नाही.
फक्त पाण्याचा प्रभावीपणे वापर आणि पाण्याचा फेरवापरावर भर देणे आवश्यक आहे. दरम्यान, शहरात “एसटीपी’ प्रकल्प जायका कंपनीच्या मदतीने उभारले जाणार आहेत. मात्र, यासाठी स्थायी समितीमध्ये एकमत झाले नसल्याने टेंडर काढले नसेल, असे पाटील यांनी यावेळी सांगितले. पाटील यांच्या या वक्तव्यानंतर सभाग़ृहात हशा पिकला.
कथित सिंचन घोटाळ्यावर भाष्य
सिंचनमध्ये 70 हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. याचा सुद्धा समाचार पाटील यांनी घेतला ते म्हणाले, “तेवढे पैसे सुद्धा खर्च झाले नव्हते.’ असे म्हणत त्यांनी विरोधकांच्या आरोपांतील धार कमी करण्याचा प्रयत्न केला.
मोफत पाण्याची मागणी कमी व्हावी
शेतीला मोफत पाणी मिळाले पाहिजे, अशी मागणी होते. निवडणुकावेळी याबाबतच्या घोषणा राजकारणी करतात. कारण पुन्हा निवडून यायचे असते. मात्र मोफतची मागणी कमी झाली पाहिजे. कारण मोफत देणारा या त्यावस्तूची अथवा सेवेचा खर्च इतर कोणत्या करातून भरून काढत असतो, असे पाटील यांनी यावेळी सांगितले.