नगर -नगर-दौंड महामार्गावर पॅच काढण्याच्या कामाच्या दोन्ही बाजूंनी रिफ्लेक्टर बसविण्यात यावे, यासाठी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले यांच्या नेतृत्वाखाली खडकी (ता.नगर) येथे आंदोलन करून कामगारांना दोरखंडानी बांधून ठेवले.
नगर-दौंड महामार्गावर पॅच काढण्याचे काम चालू आहे. पॅच काढत असताना कुठलीही दक्षता संबधीत एजन्सी घेत नसल्यामुळे या राष्ट्रीय महामार्गावर गेल्या आठ दिवसांपासून अपघाताची मालिका चालू आहे. आठ दिवसांत तीन जण दगावले तर सहा जण गंभीर जखमी झाले.
सुरक्षेच्या दृष्टीने ज्या ठिकाणी काम चालू आहे तेथे फलक लावण्यात यावे, याबाबत जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी संबंधीत विभागाला सूचना दिल्या होत्या. मात्र, याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून आले. दि.10 रोजी रात्री खडकी येथे अपघात झाला. यामध्ये चारचाकी वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दुचाकीस्वार जबर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल केले. या सर्व प्रकरणाला महामार्गावरील अधिकारी कारणीभूत आहे.
आज दुपारी दोन वाजता शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले यांनी शिवसेना स्टाईलन या ठिकाणी काम पाहणाऱ्या कर्मचाऱ्यांना दोरखंडाने बांधून ठेवले. जोपर्यत कंपनीचे अधिकारी येत नाही, तोपर्यत कर्मचाऱ्यांना बांधून ठेवणार, जखमी झालेल्या नागरिकांना रुग्णालयाचा खर्च तसेच वाहनाची नुकसान भरपाई देऊन मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, तरच या कर्मचाऱ्यांना सोडले जाईल, असा पवित्रा शिवसैनिकांनी घेतला होता.