पाऊस, अतिवृष्टी आणि दुष्काळाचा अंदाज वर्तवण्यास मदत
औरंगाबादेतील यंत्रणेचा मराठवाडा, खान्देश, विदर्भाला फायदा
पुणे – सुमारे 300 ते 400 कि.मी. परिघातील हवामान आणि भौगोलिक स्थितीवर वॉच ठेवणे, त्याचा अलर्ट देण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्यात “सी-बॅंड रडार डॉप्लर’ उभारले जाणार आहे. यासाठी शास्त्रज्ञांनी खुलताबाद व म्हैसमाळ येथे जागेची नुकतीच पाहणी केली आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद येथे ही यंत्रणा उभारणे जवळपास निश्चित असून, यामुळे हवामानाचा अचूक अंदाज कळणार आहे. मराठवाड्यासह खान्देश, विदर्भासह नगर आणि पुणे जिल्ह्यालाही काही अंशी याचा फायदा होईल. या प्रकल्पाबाबत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी नुकतीच माहिती दिली.
ही यंत्रणा उभारण्यासाठी ज्येष्ठ शास्त्रज्ञ रोहित शुक्ला यांनी जागा पाहणी केली. केंद्रीय विज्ञान मंत्रालय सचिव डॉ. एस. रविचंद्रन यांनी औरंगाबादेत सी-बॅंड डॉप्लर रडारला मान्यता दिल्याचे जाहीर केले होते. या प्रकल्पासाठी 15 कोटींचा खर्च येणार आहे. महाराष्ट्रात याआधी नागपूर व मुंबई येथे अशी यंत्रणा आहे. आता तिसरे रडार डॉप्लर औरंगाबादेत असेल.
“सी-बॅंड रडार डॉप्लर’ म्हणजे काय?
सी बॅंड रडार हे 4.0 ते 8.0 गिगाहर्टस रेंजमधील मायक्रोव्हेव फ्रिक्वेन्सीजचा उपयोग करते. संदेश दळणवळण उपग्रहांसाठी या प्रकारच्या बॅंडचा उपयोग होतो. शिवाय वाय-फाय यंत्रणा, कॉर्डलेस टेलिफोन, राष्ट्रीय सुरक्षेसाठी पाळत ठेवणे आणि हवामान बदलांवर लक्ष ठेवणाऱ्या रडार यंत्रणेत या “सी बॅंड’चा उपयोग केला जातो.
सी-बॅंड रडार डॉप्लरचे फायदे
* ढगफुटीची शक्यता असेल, तर त्याचे क्षेत्र किती असेल, याचा अंदाज येईल.
* अतिवृष्टी, ढगफुटी, दुष्काळामुळे होणारे नुकसान अलर्टमुळे टाळता येईल.
* क्लाऊड मॉनिटरिंग करता येईल. यातून वीज कुठे पडण्याची शक्यता आहे, पावसाचे प्रमाण किती असू शकते, याचा अंदाज वर्तवता येईल.