औंध (अभिराज भडकवाड) – महानगरपालिकेच्या 2017च्या निवडणुकीपूर्वी औंध-बालेवाडी हा परिसर कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा बालेकिल्ला समजला जात होता. परंतु, 2017च्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचा एकच नगरसेवक व इतर सर्व भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक निवडून आले होते. नव्याने झालेल्या या प्रभागामध्ये औंध व बालेवाडी गावठाण परिसर तसेच चार झोपडपट्टी परिसर या प्रभागांमध्ये समाविष्ट झाल्यामुळे यंदाच्या निवडणुकीमध्ये या परिसरातील राजकीय गणिते बदलण्याची चिन्हे आहेत. गावठाण परिसरातील व वस्ती परिसरातून ज्या उमदेवारास अधिक मतदान होईल, ती निर्णायक ठरणार असून तोच विजयी आघाडी टिकवेल, असा ठाम अंदाज वर्तविला जात आहे.
सध्याच्या नव्याने तयार झालेल्या प्रभागांमध्ये भारतीय जनता पक्षाचे स्थानिक तीन उमेदवार हे विद्यमान नगरसेवक आहेत तसेच इतर देखील तुल्यबळ उमेदवार भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत, त्यामुळे उमेदवारांची मोठी यादी भाजपासाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. ज्या उमेदवारास भाजपची उमेदवारी मिळणार नाही, तो उमेदवार बंडखोरी करून इतर पक्षातून किंवा अपक्ष म्हणून निवडणूक लढण्याची शक्यता नाकारता येत नाही तर “अपक्ष’ उमेदवारांची संख्या वाढल्या प्रतेक मतासाठी राजकीय पक्षाचे तिकीट घेतलेल्या उमेदवरांना झगडावे लागेल.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षामध्येही इच्छुक उमेदवारांची संख्या जास्त आहे. मात्र, प्रत्यक्ष काम करताना कमी उमेदवार दिसून येत आहेत. त्यामुळे औंध परिसरात बंडखोरी करून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षामध्ये आलेल्या उमेदवारासच राष्ट्रवादी कॉंग्रेस उमेदवारी देईल, अशी चर्चा आहे. वस्ती व गावठाण परिसरामध्ये कॉंग्रेस पक्षाचे प्राबल्य दिसून येत आहे. मात्र, सोसायटीमधील मतदारांमध्ये पोहोचण्याचे आव्हानात्मक काम उमेदवारास करावे लागणार आहे.
…तर गणिते बदलणार
महाविकास आघाडी झाल्यास औंध-बालेवाडी प्रभागातील राजकीय गणिते बदलणार आहेत, मागील निवडणुकीमधील औंध परिसरातील कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या मिळालेल्या मतदानाची बेरीज केली असता निवडून आलेल्या उमेदवार पेक्षा जास्त मते ही कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या उमेदवारांना मिळालेली दिसून येतात, त्यामुळे महाविकास आघाडी झाल्यास भाजपला या भागांमध्ये मोठी टक्कर द्यावी लागणार आहे.