पुणे -मार्केट यार्डातील तरकारी विभागातील फळभाज्या आणि पालेभाज्यांची आवक कमी झाली आहे. सोमवारी (दि.24) आणि मंगळवारी (दि.25) अनुक्रमे 70 आणि 50 गाड्यांची आवक झाली. त्या तुलनेत मागणी जास्त असल्याने सर्व प्रकारच्या फळभाज्यांच्या भावात 20 ते 25 टक्क्यांनी वाढ झाली, तर कांदा-बटाटा, पालेभाज्यांच्या भावात 10 ते 15 टक्क्यांनी वाढ झाली. तौक्ते चक्रीवादळ तसेच पावसामुळे आवकेवर परिणाम झाल्याचे श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड आडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ आणि उपाध्यक्ष अमोल घुले यांनी सांगितले.
तौक्ते चक्रीवादळाचा मध्य महाराष्ट्रातील पिकांना फटका बसला आहे. या वादळाचा पुणे विभागात मोठा परिणाम जाणवला. त्यामुळे पालेभाज्या आणि फळभाज्यांचे नुकसान झाले आहे. त्यातच पुणे विभागातील अनेक भागात सातत्याने पाऊस कोसळत आहे. या सर्वांचा परिणाम म्हणून मार्केट यार्डातील फळे व भाजीपाला विभागात भाज्यांची आवक घटली आहे. त्यातच करोनामुळे शनिवार आणि रविवार बाजार बंद असल्याने सोमवार, मंगळवारी भाज्यांना ग्राहकांकडून मोठी मागणी होती. मागणीच्या तुलनेत आवक झाली नसल्याने दरवाढ झाल्याचे सांगण्यात आले.
फळभाज्यांप्रमाणेच कांदा आणि बटाट्याची नेहमीच्या तुलनेत आवक घटली. त्यामुळे कांदा-बटाट्याच्या भावात 10 ते 15 टक्क्यांनी वाढ झाली. तसेच पालेभाज्यांची आवकही कमीच झाली. त्यामुळे बाजारात विक्रीसाठी आलेल्या पालेभाज्यांची अवघ्या काही तासांतच विक्री झाली.
10 ते 15 टक्क्यांनी वाढ…
पालेभाज्यांच्या भावात मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात 10 ते 15 टक्क्यांनी वाढ झाली असल्याचेही व्यापारी भुजबळ आणि घुले यांनी सांगितले. पुढील काही दिवस हीच परिस्थिती कायम राहील, असा अंदाजही व्यक्त केला आहे. दरम्यान, घाऊक बाजारात भाव वाढल्यामुळे किरकोळ बाजारातही भाज्यांची चढ्या भावाने विक्री होत आहे.