पुणे – “मला नारायण राणे यांच्याबाबत चर्चा करायची नाही. त्यांचे त्यांना लखलाभ. आम्हांला सरकार चालवायचे आहे. ते केंद्रात आणि आम्ही राज्यात मंत्री आहोत. त्यांनी केंद्राची कामे करावी, आम्ही राज्यातील कामे करणार.’ अशा शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार राणे यांच्या टीकेवर प्रतिक्रिया व्यक्त केली.
विधानभवन येथे पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, केंद्र सरकार देशातील सर्व राज्यांना करोनाच्या तिसऱ्या लाटेला गांभीर्याने घ्यायला सांगितले आहे. लक्ष द्या लक्ष द्या म्हणून सरकार सांगत आहे. दुसरीकडे नव्या मंत्र्यांना यात्रा काढायलाही केंद्र सरकार सांगत आहे. या यात्रांमुळे फटका बसणार आहे. जिथे जिथे जन आशीर्वाद यात्रा गेली तिथे तिथे करोनाची लागण वाढलेली दिसेल. चार नवीन मंत्री यात्रा काढत आहे. याला कोण जबाबदार आहे? नंतर करोना वाढला तर याचा विचार केंद्राने करावा. गरज तेथे राजकारण करू. पण, जिथे जनतेचा प्रश्न आहे, तिकडे एकत्र येऊन काम करावे.
देशमुख प्रकरणावर सध्या बोलणार नाही
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सीबीआयने क्लीन चीट दिली आहे. अशा काही बातम्या आज प्रसिद्ध झाल्या आहेत. त्याबाबत मी वाचले आहे. अनेक चौकश्या होत असतात. त्या-त्या वेळी सगळेजण चौकशीसाठी सहकार्य करत असतात. मात्र, देशमुख यांच्याबाबत जोपर्यंत मला अहवाल मिळत नाही. तोपर्यंत मी यावर काहीही बोलणार नाही, असे पवार यांनी सांगितले.
…तर पुन्हा निर्बंध लावावे लागतील
केरळ राज्यात निर्बंध कमी केल्याने तिथे लोकं मोठ्या प्रमाणात बाहेर पडली. सण मोठ्या प्रमाणात साजरा केला. त्यामुळे आता तिथे प्रचंड करोनाबाधितांची संख्या वाढली असल्याने पुन्हा निर्बंध लावावे लागले आहेत. महाराष्ट्रात गोपाळकाला, त्यानंतर गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी असे मोठे सण ओळीने येत आहेत. त्यामुळे नागरिकांनी सण साजरे करताना काळजी घ्यावी. अन्यथा पुन्हा मग निर्बंध लावावे लागतील, असा इशारा पवार यांनी यावेळी दिला.