पालकमंत्री अजित पवार : कालवा समिती बैठकीत निर्णय
पुणे – शहराच्या पाणी पुरवठ्यात कोणतीही कपात न करण्याचा निर्णय पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या कालवा समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील उपलब्ध पाणीसाठा विचारात घेता, हा निर्णय घेण्यात आला. तसेच नवीन मुठा कालव्यातून रब्बीसाठी आवर्तन दि. 25 नोव्हेंबरपासून सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी पवार यांनी धरणांमधील उपलब्ध पाणीसाठा विचारात घेता पुणे महापालिकेने पाणी जपून वापरावे, अशा सूचना पालिकेला दिल्या.
शासकीय विश्रामगृह येथे खडकवासला प्रकल्प कालवे सल्लागार समितीची बैठक पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री पवार यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार दत्तात्रय भरणे, रवींद्र धंगेकर, संजय जगताप, भीमराव तापकीर, चेतन तुपे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, पुण्याचे आयुक्त विक्रमकुमार, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे रमेश चव्हाण, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले उपस्थित होते.
खडकवासला प्रकल्पामध्ये 95 टक्के पाणीसाठा आहे. दौंड नगरपालिका व ग्रामीण भागातील पिण्याचे पाणी, नवीन मुठा उजवा कालवा, सणसर जोड कालवा, जनाई शिरसाई उपसा सिंचना योजना, मुंढवा जॅकवेलद्वारे पुणे महापालिकेने उपलब्ध करून दिलेल्या सांडपाण्याद्वारे जुना मुठा उजवा कालव्यातून शेतीसाठी पाणी देण्यात यावे, अशा सूचनाही पवार यांनी दिल्या.