पुणे : – पुण्याचा झपाट्याने विकास होत असताना पुण्यातील वाड्यांच्या पुनर्विकासाचा प्रश्न मात्र रखडलेला आहे. त्याचे मुख्य कारण एक मिटर साईड मार्जिंनची अट याबाबत महापालिका आयुक्तांशी पत्र व्यवहार करून हा प्रश्न तातडीने निकाली काढावा, अशी मागणी कसबा मतदार संघांचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी औचित्याच्या मुद्द्यावर बोलताना विधानसभेत केली.
या विधानसभा अधिवेशनत जुन्या वाड्यांचा पुनर्विकासाचा मुद्दा आमदार धंगेकर यांनी लावून धरला आहे. पुण्याच्या 11 पेठामध्ये दोन हजार दोनशे 32 वाड्यांची नोंद असून बांधकाम नियमावलीतील त्रुटी, मालक भाडेकरू वाद अशी अन्य कारणे या वाड्यांच्या विकासात अडचणी निर्माण करत असल्या तरी मुख्य अडचणीचा मुद्दा हा एक मिटर साईड मार्जिनचा आहे.
या वाड्यांच्या पुनर्विकासासाठी शासनाने महापालिका आयुक्ताकडे पत्रव्यवहार करून हा प्रश्न सोडवावा. ही समस्या शहराच्या पूर्व भागात मोठी असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, अनेक जुने वाडे जीर्ण अवस्थेत आहेत. त्यामुळे तेथे राहणाऱ्या नागरिकांना जीव मुठीत धरून राहावे लागते. त्यांच्या भावना तीव्र आहेत याची नोंद सरकारने घेणे आवश्यक आहे, यात चालढकल होऊ नये अशी अपेक्षा आमदार धंगेकर यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर व्यक्त केली.