पुणे (विजयकुमार कुलकर्णी) – बदलत्या काळानुसार घटस्फोटासाठी दाखल होणाऱ्या कारणांचेही स्वरूप बदलले आहे. स्वयंपाक न करणे, आवडी-निवडीतील तफावत, इगो प्रॉब्लेम अशा किरकोळ कारणांमुळे आणि सोशल मीडियाचा वाढता वापर, आर्थिक अस्थिरता, वास्तवतेचे भान न ठेवता जोडीदारांकडून केलेल्या अवास्तव अपेक्षांमुळे घटस्फोटासाठी अर्ज दाखल होण्याचे प्रमाण वाढले आहे. लग्नानंतर पाच वर्षाच्या आतच घटस्फोटासाठी दाखल होणाऱ्या दाव्याचे प्रमाण अधिक आहे.
पूर्वी पत्नीला माहेरहून पैसे आणण्यासाठी लावण्यात येणारा तगादा, सासरच्या मंडळींकडून देण्यात येणारा त्रास, नवऱ्याला असलेले दारूचे व्यसन यासारख्या कारणांनी नात्याला सुरूंग लागायचा. मात्र, आता हे चित्र बदलले आहे. समाजात पाश्चिमात्य संस्कृतीचे अनुकरण करण्यात येत आहे. त्यामुळे समाजात बदल झाला आहे. कुटुंब कलहाची आणि नात्याला सुरूंग लागण्याची कारणे बदलली आहेत. प्रतिष्ठा, उशिरा झालेला विवाह, ऐष-आरामाच्या वस्तू नसणे अथवा खरेदीपासून मज्जाव करणे, संपत्ती कोणाच्या नावावर ठेवणे, एकमेकास पुरेसा वेळ न देऊ शकणे, सोशल मीडियाचा करण्यात येणारा अतिवापर अशा कारणांमुळे पती-पत्नींमध्ये वाद होत आहेत.
अगदी किरकोळ कारणावरून दोघांत वाद होत आहेत. कपडे कुणी धुवायचे, आवडीची भाजी केली नाही, आवडीचा ड्रेस घातला नाही यासारख्या क्षुल्लक गोष्टींपासून झालेली भांडणेही थेट कौटुंबिक न्यायालयात पोहोचत आहेत. त्यातच पालकांची ढवळाढवळ वाढली आहे. अलीकडच्या काळात अनेकांना एकच अपत्य असते. मग तो मुलगा असो वा मुलगी. असे पालक घटस्फोट वाढविण्यास कारणीभूत ठरल्याचे दिसून येत आहे.
“तुलाही पगार आहे. तु लढ, घटस्फोट घेतल्याने काहीही फरक पडणार नाही’ अशी शिकवण ते मुलांना देतात. मुलांना घटस्फोट घेण्यासाठी प्रवृत्त करत असल्याचे दिसून येत आहे. त्यात दोघेही करिअरच्या पाठिमागे लागले असून, करिअरपुढे त्यांना नाते गौण वाटते. त्यामुळे घटस्फोटासाठी दाखल होणाऱ्या अर्जांचे प्रमाण वाढले आहे.
भारतात पूर्वी एकत्र कुटुंब पद्धत रुढ होती. त्यावेळी पती-पत्नींमध्ये भांडण झाल्यास ज्येष्ठ माणसं समजवायची. पती-पत्नी ज्येष्ठांचा आदर ठेवायची. त्यांचे ऐकून एकत्र यायचे. पूर्वी घटस्फोट घेणे दुर्मिळ बाब होती. घटस्फोट म्हटल्यावर धडकी भरायची. मात्र, आता पाश्चिमात्य संस्कृतीच्या अनुकरणामुळे विभक्त कुटुंब पद्धती रुजू होत आहे. किरकोळ कारणावरून झालेली भांडणे थेट कौटुंबिक न्यायालयात पोहोचत आहेत. हे थांबविण्यासाठी पुन्हा भारतीय संस्कृतीचे अनुकरण केले पाहिजे. दांपत्याच्या भांडणात वडिलधाऱ्यांनी हस्तक्षेप केल्यास हे चित्र बदलेल. जेणेकरून विवाहसंस्था अबाधित राहिल.
– ऍड. श्रीधर एस. हुद्दार