पुणे – जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील करोनाचा संसर्ग कमी होऊ लागल्याने काहीसा दिलासा मिळत होता. मात्र, मागील आठ दिवसांत हॉटस्पॉट गावांच्या संख्येत केवळ 2 ने घट झाली. तर आंबेगाव, जुन्नर आणि शिरूर तालुक्यात हॉटस्पॉटच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे संसर्ग कमी करण्यात आरोग्य विभागाला यश का येत नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
त्याला नागरिकांकडून करोना प्रतिबंधक नियमांकडे होत असलेले दुर्लक्षही कारणीभूत आहे.
ज्या गावात दहापेक्षा जास्त करोना बाधित संख्या आहे, ते गाव हॉटस्पॉट म्हणून जाहीर कले जाते. त्यानुसार दि. 5 मे रोजी ग्रामीणमधील सर्वाधिक 428 हॉटस्पॉट गावे होती. दि. 19 मे रोजी ही संख्या 397 पर्यंत खाली आली.
तर, 2 जून रोजी ती संख्या 186 इतकी होती. त्यानंतर दि. 2 ते 9 जूनदरम्यान, बाधित संख्येत लक्षणीय घट झाल्यामुळे हॉटस्पॉट गावांची संख्या तब्बल शंभरने कमी झाली. दि.9 जून रोजी हॉटस्पॉट संख्या 86 इतकी होती. हॉटस्पॉट संख्या शंभरीच्या आत आल्यानंतर आरोग्य विभागाने सुटकेचा निश्वास सोडला, पण आता बाधित आणि हॉटस्पॉट संख्या घटण्याचा वेग मंदावला आहे.
आंबेगाव, जुन्नर आणि शिरूर तालुक्यात कमी झालेली हॉटस्पॉट संख्या पुन्हा वाढली आहे. तर बारामती, हवेली, दौंड, इंदापूर आणि मुळशी तालुक्यातील हॉटस्पॉट संख्या घटली आहे. दरम्यान, मागील एक महिन्यापासून वेल्हा तालुक्यात एकही हॉटस्पॉट गाव नव्हते. मात्र, आता
2 हॉटस्पॉट संख्या झाली आहे.