पुणे – अपघातात मृत्यू झालेल्या सरकारी नोकरदाराच्या कुटुंबियांना एका वर्षाच्या आत न्याय मिळाला आहे. तडजोडीअंती 86 लाख रुपये देण्याचा निर्णय शनिवारी (दि.9) झालेल्या लोकअदालतमध्ये झाला. या तडजोडीसाठी अर्जदारांचे वकील ऍड. जी.पी.शिंदे, विमा कंपनीचे वकील ऍड. सुनील द्रविड आणि विमा कंपनीचे अधिकारी सुखप्रितसिंह आण् अर्मितासिंह यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
शरद (नाव बदलले आहे) असे अपघातात मृत्यू झालेल्याचे नाव आहे. ते सोलापूर येथून मुंबईला चालले होते. त्यावेळी इंदापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत ट्रकने कारला धडक दिली. त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले. उपचारासाठी रुणालयात नेत असतानाच त्यांचा मृत्यू झाला.
सप्टेंबर 2022 मध्ये घडलेल्या घटनेनंतर नुकसान भरपाई मिळावी, यासाठी पत्नी, आई आणि दोन मुलांनी येथील मोटार अपघात न्यायप्राधिकरण येथे दावा दाखल केला. गो-डिजिट जनरल इन्शुरन्स कंपनीच्या विरोधात ऍड. जी.पी.शिंदे यांच्यामार्फत हा दावा दाखल करण्यात आला.
मृत्यूसमयी त्यांचे वय 49 होते. त्यांना दरमहा 60 हजार रुपये पगार होता. पत्नी, दोन मुले आणि आईचे अवलंबत्व होते, याचा विचार करून सव्वा कोटी रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी दाव्यात करण्यात आली. मात्र, 86 लाख रुपयांवर लोकअदालतमध्ये तडजोड झाली.
“लोकअदालतमध्ये तडजोड केल्यानंतर अपील नसते. वेळ, दाव्यासाठी लागणारा खर्च वाचतो. होणाऱ्या मानसिक त्रासातून सुटका होते. भरलेली स्टॅम ड्युटी माघारी मिळते. त्यामुळे लोकअदालतमध्ये तडजोड करणे पक्षकारांसाठी फायदेशीर आहे.”
– ऍड. जी.पी.शिंदे, अर्जदारांचे वकील.