फक्त प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या प्रभागांतच बदल; सर्वसामान्य माजी नगरसेवक, कार्यकर्ते वाऱ्यावर
पुणे – महापालिका निवडणुकांची अंतिम प्रभाग रचना शुक्रवारी रात्री जाहीर झाली. त्यात 58 पैकी 32 प्रभागांच्या रचनेत बदल करण्यात आले आहेत. मात्र, हे बदल नुकतीच मुदत संपलेले पदाधिकारी तसेच माजी पदाधिकाऱ्यांच्या प्रभागांतच करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, हे पदाधिकारी सर्वच राजकीय पक्षांचे आहेत. त्यामुळे आधी प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा, त्यानंतर प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा यावरून एकमेकांवर प्रभाग रचनेत राजकीय हस्तक्षेप झाल्याचा आरोप करणारे पदाधिकारी अंतिम प्रभाग रचनेनंतर शब्दही बोलण्यास तयार नाहीत.
प्रभाग रचना करेपर्यंत आरोप-प्रत्यारोपांचा केवळ दिखावू “तमाशा’ करण्यात आला. तर त्यानंतर, अंतिम प्रभाग रचनेत सत्ताधारी आणि विरोधकांनी आपले राजकीय अस्तित्त्व टिकविण्यासाठी एकत्र येत मनासारखी प्रभाग रचना करून घेतल्याने आतून एकसुरात “कीर्तन’ केल्याची राजकीय चर्चा रंगली आहे. यामध्ये सर्वाधिक बदल कोथरूड विधानसभा मतदारसंघातील 13 प्रभागांमध्ये झाले असून, वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातील एकाही प्रभागात सीमांचा बदल झालेला नाही. केवळ काही प्रभागांची नावे बदलण्यात आली आहेत. त्यामुळे या मतदारसंघात भाजपच्या शहराध्यक्षांना शह देण्यात आल्याचे बोलण्यात येत आहे. तर बदल झाल्यानंतर अनुकूल झालेले जवळपास 20 पेक्षा अधिक प्रभाग आजी-माजी पदाधिकारी, विद्यमान आमदार, तसेच, मोठ्या राजकीय नेत्यांशी संबंधित नगरसेकांचे आहेत.
32 प्रभागांत बदल; मतदारसंघनिहाय माहिती
प्रभाग रचनेच्या हरकती आणि सुनावणीनंतर शहरातील 32 प्रभागांमध्ये बदल झाले आहेत. त्यात सर्वाधिक बदल
कोथरूड विधानसभा मतदारसंघात सर्वच्या सर्व 13 प्रभागांमध्ये बदल झाला आहे. यामध्ये प्रभाग 12, 13, 14 आणि 15 क्रमांकाच्या प्रभागासह 30 ते 37 क्रमांकाच्या प्रभागांचा समावेश आहे. यात 6 प्रभागांना नवीन भाग जोडण्यात आला आहे. तर 7 प्रभागांचा भाग वगळण्यात आला आहे. प्रामुख्याने हा भाग कोथरूड विधानसभा मतदारसंघातील सर्वच राजकीय पक्षांचे आजी-माजी पदाधिकारी, विद्यमान पदाधिकारी यांच्या प्रभागांतील आहेत. प्रारूप प्रभाग रचनेत काही पदाधिकाऱ्यांचा हक्काचा मतदार इतर प्रभागात गेला होता. तर काही पदाधिकाऱ्यांना जादा भाग आला होता. हा भाग अंतिम प्रभाग रचनेत वगळण्यात आला असून, भाजप-राष्ट्रवादी तसेच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना याचा फायदा होणार असल्याचे बोलले जात आहे.
पर्वती मतदारसंघात 5 प्रभागांमध्ये बदल करण्यात आला असून, त्यातही महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांचा तसेच राज्यातील पदाधिकाऱ्यांच्या नातेवाईकांच्या प्रभागांचा समावेश आहे. हडपसर विधानसभा मतदारसंघातील 8 प्रभागांमध्ये बदल करण्यात आला असून त्यात सर्वात मोठा बदल कोंढवा-मिठानगर प्रभाग 41 मध्ये करण्यात आला असून या प्रभागात नव्याने तब्बल 10 हजार लोकसंख्या जोडण्यात आली आहे. तर खडकवासला विधानसभा मतदारसंघात 6 बदल करण्यात आले असून शिवाजीनगर विधानसभा मतदार संघात 1 बदल करण्यात आला आहे.
युद्धात हरले; पण तहात जिंकले..
अंतिम प्रभाग रचना पाहता, ही सर्वपक्षीयांच्या सहमतीने झाल्याचे चित्र आहे. प्रभाग रचनेचा कच्चा आराखड्यात राष्ट्रवादी मागे पडली होती. त्यामुळे भाजपने आपल्याला हवी तशी प्रभाग रचना केल्याचे बोलले जात होते. मात्र, त्यानंतर सावध आणि आक्रमक झालेल्या राष्ट्रवादीने राज्यातील सत्तेचा वापर करत प्रभाग रचनेत पुन्हा आक्रमकता दाखवत भाजपच्या अडचणी वाढवल्या होत्या. प्रारूप प्रभाग रचना झाल्यानंतर भाजपचे गेल्या पाच वर्षांतील सर्वच प्रमुख पदाधिकारी अडचणीत आल्याचे चित्र होते. मात्र, राष्ट्रवादीच्या या भूमिकेने शिवसेनेचीही कोंडी झाली होती. त्यामुळे शिवसेनेकडूनही राज्यस्तरावर आपली ताकद पणाला लावली. या सर्वांचा परिपाक म्हणून कच्च्या प्रभाग रचनेत मागे पडलेल्या राष्ट्रवादीने अंतिम प्रभाग रचनेत मात्र, सर्वांना सोबत घेऊन बाजी मारली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला फायदा होणार आहेच. मात्र, त्यासोबतच भाजपच्या केवळ पदाधिकाऱ्यांना फायदा झाला असून अध्यात – मध्यात नसलेल्या नगरसेवकांवर मात्र रडण्याची वेळ आली आहे.
“मुंबईवारी’ फळाला?
अंतिम प्रभाग रचना जाहीर होण्याच्या दोन दिवस आधी भाजप तसेच राष्ट्रवादीचे काही पदाधिकारी मुंबईत तळ ठोकून होते. एवढेच नव्हे, तर काही जणांनी आपली काही कार्यकर्ते प्रमुख ठिकाणांवर तैनात केले होते. तेथे कोण अधिकारी, अथवा कर्मचारी कधी प्रभाग रचनेची माहिती घेऊन आले याची माहिती ठेवण्याचे काम देण्यात आले होते. तर काही जण सर्वांच्या वतीने राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी घेऊन प्रभाग रचनेवर लक्ष ठेऊन होते. एकमेकांच्या मदतीसाठी करण्यात आलेली “मुंबईवारी’ फळाला आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.