पुणे – इयत्ता दहावी व बारावीची मार्च-एप्रिल 2022 ची परीक्षा व्यवस्थित व्हावी, यासाठी राज्य शिक्षण मंडळात नुकतीच आढावा बैठक झाली.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक महामंडळ यांची ही संयुक्त बैठक होती. यावेळी राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी, सचिव डॉ. अशोक भोसले, मुख्याध्यापक महामंडळाचे सचिव शांताराम पोखरकर, प्रवक्ते महेंद्र गणपुले, पुणे जिल्हा अध्यक्ष हरिश्चंद्र गायकवाड आदी सहभागी झाले होते. मुख्याध्यापक महामंडळाने 60 व्या अधिवेशनाची स्मरणिकाही यावेळी दिली.
या सभेत प्रत्येक शाळेत परीक्षा केंद्र असल्यामुळे सर्वाना मुख्य केंद्र संचालकांनी प्रशिक्षण देण्याचे ठरविण्यात आले. शाळानिहाय बैठक नियोजन छापील व्यवस्था मिळणार आहे. हात निर्जंतुकीकरणसाठी बोर्डाकडून निधी मिळणार आहे.परीक्षेसाठी मनुष्यबळ कमी असल्यास त्याच व्यवस्थापनाच्या इतर विभागातील शिक्षकांचा वापर करावा.
प्रश्नपत्रिका वाटप व उत्तरपत्रिका जमा करण्यासाठी कस्टडी मध्ये संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांच्या नियंत्रणामधील प्राथमिक विभागाचा स्टाफ घ्यावा आदेश दिले आहेत. प्रश्नपत्रिका 25 च्या पाकिटामध्ये सीलबंद मिळणार आहेत. करोनाच्या बाबत इतर साहित्य शाळेने वापरायचे आहे. उपकेंद्रांनी दररोज मुख्य केंद्रावरून प्रश्नपत्रिका नेणे व उत्तरपत्रिका पुन्हा मुख्य केंद्रावर जमा करायच्या आहेत.