पुणे – विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग देशाच्या हिताबरोबरच सामाजिक प्रगतीमध्ये योगदान देण्यासाठी केला पाहिजे, असे प्रतिपादन टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे (टिमवी) कुलपती डॉ. दीपक टिळक यांनी केले.
पंजाब येथील देश भगत विद्यापीठातर्फे 11 व्या दीक्षान्त समारंभात डॉ. दीपक टिळक यांना सन्माननीय डी.लिट. पदवी देऊन गौरविण्यात आले. महिला शक्तीच्या विकासासाठी अखंड कार्यरत असलेल्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. गीताली टिळक यांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला. देश भगत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अभिजित जोशी, प्र-कुलगुरू प्रा. तजिंदर कौर, कुलसचिव कर्नल प्रदीप कुमार, डॉ. संदीप सिंग, डॉ. आर. एस. बेदी, प्रा. डॉ. ऋषी कौर बेदी, टी. एस. बेदी, हरविंदर सिंग यावेळी उपस्थित होते.
डॉ. टिळक म्हणाले, सध्या असलेली स्पर्धा आणि आव्हानांकडे पाहिल्यास विद्यार्थ्यांकडे येणार्या काळात सर्व क्षेत्रातील ज्ञान असणे आवश्यक आहे. नवे ज्ञान विद्यार्थ्यांनी आत्मसात केले पाहिजे. बदलते तंत्रज्ञान आणि येणार्या नवीन आव्हानांकडे विद्यार्थ्यांनी संधी म्हणून पाहावे. कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञान आत्मसात केले पाहिजे. टिळक महाराष्ट्र विद्यापीठ लोकमान्यांच्या विचारावर पुढे जात आहे. स्वदेशी, राष्ट्रीयत्व आणि राष्ट्रीय शिक्षणासाठी त्यांचा आग्रह होता. आज त्याच विचारावर देश पुढे जात असल्याचे यावेळी त्यांनी नमूद केले.