सिंहगडरस्ता – नांदोशी, किरकटवाडी परिसरात अनेक वर्षांपासून बेकायदेशीर गौण खनिज उत्खनन सुरू आहे. यामुळे पर्यावरणाची हानी होण्यासोबतच तेथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अवजड वाहनामुळे अपघात घडत आहेत. यामुळे येथील बेकायदेशीर उत्खनन व्यवसाय बंद करण्याबाबत नागरिकांनी प्रशासनाला निवेदन दिले होते, याची दखल घेत निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी सदर उत्खनन बंदचे आदेश काढले आहेत.
किरकटवाडीचे माजी उपसरपंच हरेश मंडले यांनी अवैध गौण खनिज उत्खननाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तक्रार अर्ज केला होता. किरकटवाडी व नांदोशी नागरिकांच्या शिष्टमंडळानेही जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांची भेट घेत नियमबाह्य गौण खनिज उत्खनन बंद करण्याबाबत निवेदन दिले होते. रास्ता रोको आंदोलन करण्यासह तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशाराही नागरिकांनी दिला होता. याची दखल घेत निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे यांनी हवेली तहसीलदार तृप्ती कोलते-पाटील यांना बेकायदेशीर गौण खनिज उत्खनन तत्काळ बंद करण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत हरेश गुलाबराव मंडले, नरेंद्र हगवणे, निलेश काळोखे, शंकर घुले, श्रीराम कदम, बाळासाहेब आम्ले, दिलीप तुपे, महेश काळोखे, सुनील चौधरी, गणेश गाडे, बायडाबाई सणस, उषा काळोखे आदी नागरिकांनी पाठपुरावा केला.
नांदोशी येथे सध्या चार ते पाच दगडखाणींतून गौण खनिज उत्खनन सुरू आहे. त्यापैकी केवळ कविता संदीप रानवडे यांच्या खाणीचा परवाना सद्य:स्थितीत सुरू आहे. इतर खाणींचे परवाने मागील दोन ते तीन वर्षांपूर्वीच संपलेले आहेत. यातून शासनाचाही करोडो रुपयांचा महसूल बुडाला आहे.
– हिम्मत खराडे, निवासी उपजिल्हाधिकारी
आजच मी नांदोशी गावातील खाणींना भेट दिली. तीन खाणी मला बंद आढळल्या. कुलकर्णींच्या खाणीमध्ये क्रशर सुरू होता तेथील तपासणी केली असता त्यांनी कोथरूड येथील बांधकाम प्रकल्पावरून दगड आणल्याचे दिसत होते आणि रानवड यांची जी खाण आहे त्याची मुदत जूनपर्यंत आहे. खाणींना सील कसे लावायचे? प्रत्यक्षात ते शक्य नाही. मार्च एन्डिंगमुळे माझ्याकडे खूप काम आहे. कर्मचारी संख्या अपुरी आहे. जिल्हा अधिकाऱ्यांच्या बंदच्या आदेशानुसार वीजपुरवठाही बंद करू शकतो, हा एक पर्याय असू शकतो.
– तृप्ती कोलते पाटील, तहसीलदार, हवेली