पुणे – महापालिकेकडून दहावी-बारावीच्या गुणवंतांना दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीची अंतिम बिले तयार झाली असून पुढील आठवड्यात मुलांच्या बॅंक खात्यात शिष्यवृत्ती रक्कम जमा करण्यास सुरूवात केली जाणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली. या योजनेसाठी यंदा तब्बल 16 हजार अर्ज आले आहेत. त्यात, दहावीसाठीचे 7 हजार 878, तर 12 वीसाठीचे 8 हजार 96 अर्ज आलेले आहेत. दरम्यान, ही रक्कम थेट मुलांच्या बॅंक खात्यात जमा होणार आहे.
महापालिकेच्या हद्दीत राहणाऱ्या इयत्ता दहावीमधील विद्यार्थ्यांना भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना लोकशाहीर अण्णा भाऊ साठे अर्थसाहाय्य योजनेंतर्गत शिष्यवृत्ती दिली जाते. 10 वीच्या विद्यार्थ्यांना 15 हजार आणि 12 वीसाठी 25 हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते.
गेल्यावर्षी करोनाची दुसरी लाट आल्याने परीक्षा न घेता वार्षिक कामगिरीवर ऑगस्ट महिन्यात निकाल जाहीर झाले होते. महापालिकेने यानंतर शिष्यवृत्तीचे अर्ज मागविले होते. करोनामुळे पदवीची प्रवेश परीक्षा लांबणीवर पडली. त्यामुळे 28 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्यास मुदत वाढविण्यात आली. त्यानंतर सुमारे 16 हजार अर्ज आले असून त्याच्या पडताळणीचे काम पूर्ण झाले आहे. तर, ज्या मुलांच्या बॅंक खात्यांचा तपशील चुकला आहे. त्यांच्याशीही समाज विकास विभागाकडून संपर्क साधलेला आहे. दरम्यान, या मुलांच्या खात्यात शिष्यवृत्ती पाठविण्यासाठीची आवश्यक असलेली सर्व बिले तयार करण्यात आली असून अंतिम मान्यतेसाठी हा प्रस्ताव आयुक्तांच्या समोर ठेवला आहे. आयुक्तांची मान्यता मिळताच ही शिष्यवृत्ती तत्काळ मुलांच्या खात्यात जमा केली जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.