पुणे – तोक्ते चक्रवादळ, पाऊसाचा फटका मार्केटयार्डातील तरकारी विभागातील फळभाज्या आणि पालेभाज्यांच्या आवकेवर परिणाम झाला आहे. आवक घटली आहे.
सोमवारी (दि.२४) आणि मंगळवारी (दि.२५) अनुक्रमे ७० आणि ५० गाड्यांची आवक झाली. त्या तुलनेत मागणी जास्त असल्याने सर्व प्रकारच्या फळभाज्यांच्या भावात २०ते २५ टक्क्यांनी वाढ झाली, तर कांदा-बटाटा, पालेभाज्यांच्या भावात १० ते १५ टक्क्यांन वाढ झाल्याची माहिती श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड आडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ आणि उपाध्यक्ष अमोल घुले यांनी दिली.
मागील आठवड्यात तौक्ते चक्रीवादळाचा मध्य महाराष्ट्रातील पीकांना फटका बसला आहे. या वादळाचा पुणे विभागात मोठा परिणाम जाणवला. त्यामुळे पालेभाज्या आणि फळभाज्यांचे नुसान झाले आहे. त्यातच पुणे विभागातील अनेक भागात सातत्याने पाऊस कोसळत आहे.
या सर्वांचा परिणाम म्हणून मार्केटयार्डातील फळे व भाजीपाला विभागात भाज्यांची आवक घटली आहे. त्यातच करोनामुळे शनिवार आणि रविवार बाजार बंद असल्याने सोमवार, मंगळवारी सकाळी भाज्यांना ग्राहकांकडून मोठी मागणी होती. मागणीच्या तुलनेत आवक झाली नसल्याने दरवाढ झाल्याचे सांगण्यात आले.