पुणे – मार्केटयार्ड परिसरातील घाऊक व्यापाऱ्यांनी 8 ते 10 हॉटेल, रेस्टॉरंट चालकांनी धान्य, किराणा आदी मालाची रक्कम थकवल्याची तक्रार पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे केल्या आहेत.
प्रत्येक रेस्टॉरंट चालकाने पाच लाख ते दहा लाखांपर्यंत उधारी थकविली असल्याने ही रक्कम कोट्यवधी रुपये होत असल्याने पोलिसांनीही या तक्रारीची गंभीर दखल घेत प्राथमिक तपास सुरू करीत संबंधितांशी चर्चा सुरू केली आहे.
लॉकडाऊनमुळे व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हॉटेल चालकांना पार्सल सेवेसाठी सवलत असली तरी नेहमीच्या तुलनेत केवळ पाच ते दहा टक्केच व्यवसाय होत आहे. यामुळे त्यांच्यावर अवलंबून असलेल्या इतर व्यावसायिकांचेही नुकसान झाले आहे.
यातून आर्थिक व्यवहार, भाडे थकवणे, मालाच्या उधारीची रक्कम न फेडणे अशा अनेक तक्रारी पोलिसांकडे येऊ लागल्या आहेत.
मार्केटयार्ड व इतर परिसरातील काही घाऊक धान्य व्यापाऱ्यांनीही काही रेस्टॉरंट चालकांविरोधात मालाचे पैसे (उधारी) दिली नसल्याच्या तक्रारी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे केल्या आहेत.मार्केट यार्डातील धान्य व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार रेस्टॉरंट चालकांनी त्यांना जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात लाखो रुपयांमध्ये ऑर्डर दिली होती. त्यानुसार धान्य व इतर किराणा वस्तूंचा पुरवठा करण्यात आला. मात्र, त्याचे पैसे अद्यापही देण्यात आलेले नाहीत.
मार्च 2020 पासून सुमारे आठ ते दहा रेस्टॉरंट चालकांनी उधारी दिलेली नाही, अशी तक्रार व्यापाऱ्यांनी केली आहे. सिंहगड रस्त्यावर स्थित दोन रेस्टॉरंट्स आणि शहरातील जुन्या भागातील रेस्टॉरंट्स बंद पडले आहेत. त्यांनी आपली भांडी, फर्निचर व इतर मौल्यवान वस्तू बाजारात विकली आहेत.
पण, धान्य, किराणा मालाचे पैसे दिलेले नाहीत. घाऊक विक्रेत्यांचा या प्रत्येक रेस्टॉरंटने पाच लाख ते दहा लाखांपर्यंत थकीत देय रक्कम दिली नाही, असा आरोपही मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांनी केला आहे.
हॉटेलचे भाडेही थकवले…
शहरातील अनेक हॉटेल व्यावसायिकांनी भाडेही थकविली आहेत. लॉकडाऊनमुळे व्यवसाय नसल्याने चार ते पाच महिन्यांचे भाडे थकले आहे. अनेकांनी भाडे थकवूनही दुकानांचे ताबे सोडले नाहीत. पुन्हा चांगला स्पॉट मिळण्याची शक्यता नसल्याने अनेकांनी भाडे थकवून जागेचा ताबाही सोडलेला नाही. यामुळे जागा मालक अडचणीत आले आहेत. यावर कायदेशीर कार्यवाही करायची झाल्यास वेळ आणि पैसाही वाया जात आहे. तर काही मालक आणि व्यावसायिकांनी परस्पर सामंजस्याने भाडे 50 टक्के करून तोडगाही काढला आहे.
हॉटेलचे भाडेही थकवले…
शहरातील अनेक हॉटेल व्यावसायिकांनी भाडेही थकविली आहेत. लॉकडाऊनमुळे व्यवसाय नसल्याने चार ते पाच महिन्यांचे भाडे थकले आहे. अनेकांनी भाडे थकवूनही दुकानांचे ताबे सोडले नाहीत. पुन्हा चांगला स्पॉट मिळण्याची शक्यता नसल्याने अनेकांनी भाडे थकवून जागेचा ताबाही सोडलेला नाही. यामुळे जागा मालक अडचणीत आले आहेत. यावर कायदेशीर कार्यवाही करायची झाल्यास वेळ आणि पैसाही वाया जात आहे. तर काही मालक आणि व्यावसायिकांनी परस्पर सामंजस्याने भाडे 50 टक्के करून तोडगाही काढला आहे.
राज्यातील लॉकडाऊनच्या परिस्थितीमुळे रेस्टॉरंट्स चालकांनी मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांची उधारी थकविली असल्याचे प्राथमिक तपासातून दिसते. उधारी थकविल्याची तक्रार दोन घाऊक धान्य विक्रेत्यांनी आमच्याकडे केली आहे. परंतु, अद्याप औपचारिक तक्रारी नोंदविल्या गेल्या आहेत. आम्ही आधी या प्रकरणाची चौकशी करू आणि त्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करू.
– सुरेंद्र देशमुख,सहायक आयुक्त पोलीस (गुन्हे)
लॉकडाऊनमुळे आवक-जावक बंद झाली आहे. हॉटेल चालकांचा दररोजचा गलला असतो. मात्र, आता त्यांना पैसे मिळणे मुश्किल झाले आहे. मार्केटयार्डमधील घाऊक व्यापाऱ्यांचे करोडो रुपये हॉटेल व्यावसायिकांकडे अडकले आहेत. परिस्थिती सुरळीत झाल्यावर त्यांनी थोडे-थोडे करून तरी पैसे दिले पाहिजेत.
– पोपटलाल ओस्तवाल,अध्यक्ष, दि पूना मर्चंट चेंबर
करोनाची परिस्थिती अचानक उद्भवली आहे. हॉटेल व्यावसायिकांशी वर्षानुवर्षे संबंध असल्याशिवाय व्यापारी किराणा माल उधारीवर देत नाहीत. लॉकडाऊनमुळे हॉटेल व्यवसाय बंद झाल्यावर अनेक व्यापाऱ्यांनी सामंजस्याची भूमिका दाखवत दिलेला माल परत घेऊन किरकोळ ग्राहकांना विकला आहे. अगदी मद्य कंपन्या व कोल्ड्रींक कंपन्यांनीही त्यांचा दिलेला माल परत घेतला आहे. एखाद्या दुसऱ्या घटनेत उधारी बुडल्याची किंवा देऊ शकत नसल्याची परिस्थिती उदभवली असेल.
– गणेश शेट्टी, अध्यक्ष, पुणे हॉटेल असोसिएशन