तळमजल्यांवरील रहिवाशांसह सर्वच सदनिकाधारकांची भीती वाढली
पुणे: गेल्यावर्षी आलेल्या पुराचा सर्वात मोठा फटका पद्मावतील येथील गुरूराज सोसायटीला बसला होता. ओढ्यावर महापालिकेने बांधलेली पुर्ण भिंत फुटून ओढ्याच्या पुराचे सारे पाणी सोसायटीत घुसून पुर्ण सोसायटीचे अतोनात नुकसान झाले आहे. अनेकांचे संसार अजून सावरलेले नसतानाच आता पावसाळा तोंडावर आला असतानाहीं ती पडलेली भिंत महापालिकेने बांधली नसल्याने सोसायटीतील सारेच सदस्य आता पुन्हा धास्तावले आहेत.
मे संपुन आता जून महिना सुरू व्हायची वेळ आली तरी ओढ्यावरील भिंतीचे बांधकाम सुरूच न झाल्याने रहिवाशांकडून व्यक्त होत असलेली भीता अनाठायी नाही. ही भिंत पडल्यानंतर तत्कालिन पालकमंत्र्यांसह सर्वच लोकप्रतिनिधींनी आणि महापालिका आयुक्तांनीहीं या सोसायटीला भेट देऊन येथील स्थितीची पहाणी केली होती. या स्थितीवर कायमची उपाययोजना करण्याचे आश्वासनही रहिवाशांच्या पदरी पडले होते.
आज ना उद्या हे काम होईल अशा भरवशावर गुरूराज सोसायटीतील सदस्य होते. पण अजूनही या पडलेल्या भिंतीच्या पुनर्रउभारणीची कोणतीच हालचाल सुरू झालेली नाही. आता ऐन पावसाळ्यात तरी हे काम हाती घेतले जाईल का? हा मुख्य प्रश्न तेथील रहिवाशांना सतावतो आहे. या पुरात बहुतेक इमारतींमध्ये पाणी घुसले होते.
काहीं इमारतींचे पहिले मजले पाण्याखाली गेले होते. त्यामुळे वरच्या मजल्यावरील लोकांनी खालच्या मजल्यावरच्या लोकांना साड्यांचे दोरखंड करून वर ओढून घेतले होते त्यामुळे त्यांचे जीव वाचले होते पण त्यांच्या घरातील एकूण एक वस्तुंचे नुकसान झाले आहे. चार चाकी आणि दुचाकी गाड्या वाहून गेल्याने अपरिमित हानी झाली आहे. आता पुन्हा अशाच आव्हानाला सामोरे जावे लागले तर काय करायचे याची चिंता रहिवाशांना सतातवते आहे.
पडलेली भिंत महापालिकेचीच
गुरूराज सोसायटीच्या मागच्या बाजूने वाहणाऱ्या ओढ्याने संपुर्ण सोसायटी वेढली गेली आहे. मागच्या पुरात तेथील जी भिंत पडली ती महापालिकेनेच बांधली होती. पण आता मात्र खासगी सोसायटीची सीमा भिंत महापालिकेकडून बांधायला काही जणांकडून आडकाठी सुरू आहे. वास्तविक ही भिंत महापालिकेची होती व ती बांधून देण्याची त्यांचीच जबाबदारी असताना त्याविषयी महापालिकेने अत्यंत बेफिकीरी दाखवली आहे.
सार्वजनिक ओढ्यावरील बांधबंदिस्ती ही महापालिकेची जबाबदारी असताना या भिंतीच्या खर्चाची जबाबदारी तेथील कनिष्ट मध्यमवर्गीयावर ढकलणे योग्य नसल्याची अनेकांची भावना आहे. ओढ्यावर संरक्षक भिंत बांधणे हे खासगी काम आहे असे कारण देऊन महापालिकेने रहिवाशांना वाऱ्यावर सोडल्यास आणि त्यातून त्यांचे काहीं नुकसान झाल्यास त्याला महापालिकेचेच प्रशासन पुर्ण जबादार असेल असा इशाराहीं रहिवाशांनी दिला आहे.