पुणे – लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर पुणेकरांना दिलासा मिळाला असून, शहरात कोणतीही पाणीकपात न करण्याचा निर्णय कालवा समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. मात्र, पालिकेने १५ जुलैपर्यंत ८.१० टीएमसी पाणी राखीव ठेवण्याची केलेली मागणी या बैठकीत नाकारण्यात आली. उलट महापालिकेनेच पुढील पाच महिन्यात एक टीएमसी पाणी वाचविण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
कालवा समिती बैठकीतील निर्णयानुसार महापालिकेस १५ जुलैपर्यंत ७.१० टीएमसी पाणी दिले जाणार आहे. हे बचत झालेले पाणी शेतीसाठी दिले जाणार आहे. दरम्यान, खडकवासला धरणसाखळीत सध्या १६.२८ टीएमसी पाणी असून, त्यातील ७ टीएमसी महापालिकेला तर सात टीएमसी जलसंपदा विभागाला सिंचन तसेच पाणी पुरवठ्यासाठी दिले जाणार आहे. तर, उर्वरित पाण्याचे बाष्पीभवन तसेच गळती गृहीत धरण्यात आली आहे. दरम्यान, शेतीसाठीचे आवर्तन ३ मार्चपासून सुरू केले जाणार आहे. तर पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेली ही बैठक अवघ्या दहा मिनिटांत उरकण्यात आली.
मंगळवारी पालिकेत बैठक
आता पुण्यातील पाण्याचे नियोजन तसेच जलसंपदा विभाग आणि महापालिकेत असलेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी येत्या मंगळवारी (दि.२७ ) महापालिका आणि जलसंपदा अधिकार्यांची बैठक होणार आहे. पाणीबचत कशी करता येईल, पालिकेचे नियोजन काय असेल याबाबत बैठकीत चर्चा केली जाणार आहे.
पालिकेची कोंडी
महापालिकेने एक टीएमसी पाणी कमी वापर करण्यासाठी पाटबंधारे विभागाने महापालिकेकडून खडकवासला धरणातून घेतले जाणारे पाणी कमी करण्याच्या सूचना केल्या आहेत. महापालिका खडकवासला धरणातून काही महिन्यांपूर्वीपर्यंत दिवसाला १,४९० ते १,५१० एमएलडी पाणी प्रतिदिन घेत होती.
मात्र, पालिकेकडून शहरात गळती रोखणे, पाण्याचा अपव्यय थांबविणे अशा उपाय योजना करत हा वापर दैनंदिन १]४५० पर्यंत खाली आणला आहे. मात्र, आता तो दैनंदिन १,४०० एमएलडीपर्यंत कमी करणे अपेक्षित असल्याने महापालिकेने सुमारे ५० एमएलडी पाण्याचे कपात न करता नियोजन करायचे असल्याने महापालिकेची कोंडी होणार आहे.
“उन्हाळ्यात शेतीसाठी पाणी आवश्यक असल्याने खडकवासला धरणातून दररोज पुण्यासाठी घेतले जाणारे पाणी कमी करण्याच्या सूचना कालवा समितीच्या बैठकीत देण्यात आल्या आहेत. त्यानुसार, नागरिकांची अडचण न करता योग्य तो निर्णय घेतला जाईल.” – नंदकिशोर जगताप, पाणीपुरवठा विभाग प्रमुख, मनपा