पुणे – जुना पुणे-मुंबई महामार्गावर सततच्या होणाऱ्या वाहतूक कोंडीतून प्रवाशांची सुटका करण्यासाठी करण्यासाठी या महामार्गावर नऊ ठिकाणी उड्डाणपूल बांधण्याच्या प्रकल्पाचा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने हाती घेतला. मात्र, मागील तीन-चार वर्षांपासून हा प्रकल्प कागदावरच राहिला आहे. हा प्रकल्प झाल्यास जुना पुणे- मुंबई महामार्गावर वाहतुकीचा वेग वाढणार आहे.
पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर दरडी कोसळण्याचे प्रकार पावसाळ्यात घडतात. त्यामुळे दरडी काढण्याच्या कामादरम्यान किंवा मोठा अपघात होऊन वाहतूक कोंडी झाल्यानंतर या महामार्गावरील वाहतूक जुना पुणे – मुंबई महामार्गावर वळवली जाते. तसेच सलग येणाऱ्या सुट्टयांमुळे द्रुतगती महामार्गावर वाहनांच्या लांबच – लांब रांगा लागतात. त्याचबरोबर जुना पुणे -मुंबई महामार्गाच्या कडेला मोठ्या प्रमाणावर नागरिकीकरण झाले आहे. त्यामुळे या रस्त्यावरही वाहनांची संख्या वाढली आहे.
नागरीकरणामुळे महामार्गावरील चौकात यु-टर्न घेण्यासाठी तसेच पलीकडे वळण्यासाठी मुख्य रस्त्यावरून जावे लागते. त्यामुळे एखाद्या वाहनाने वळण घेण्यासाठी गाडी थांबली तरी पाठीमागे वाहनांच्या रांगा लागतात. या सर्व पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातून जाणाऱ्या पुणे- मुंबई महामार्गावर नऊ ठिकाणे उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय एमएसआरडीसीने घेतला. यामुळे देहूरोड ते लोणावळ्यापर्यंत नऊ ठिकाणी उड्डाणपूल होणार असल्याने सरळ वेगाने वाहने पुढे जाणार आहे.
त्यामुळे या प्रमुख नऊ चौकात होणारी वाहतूक कोंडीतून प्रवाशांची सुटका होणार असून ज्या प्रवाशांना रस्ताच्या पलीकडे अथवा वळण घ्यावयाचे आहे. अशा प्रवाशांना उड्डाणपुलाखालून जाता येणार आहे. जुना पुणे – मुंबई महामार्गाचा वापर प्रामुख्याने लोणावळा, तळेगाव, कामशेत या ठिकाणी जाण्यासाठी करण्यात येतो. या महामार्गावरून पुढे द्रुतगती महामार्गावर सुध्दा जाता येते.
निधी मिळाल्यावर प्रत्यक्षात काम
नोकरी- व्यवसायानिमित्त मुंबईला जाणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. जुना पुणे- मुंबई महामार्गावर तळेगाव येथे औद्योगिक क्षेत्र असल्यामुळे वाहतूक मोठ्या प्रमाणावर होते. तळेगाव, वडगाव मावळ, चाकण येथे औद्योगिकीकरण वाढल्याने जड वाहतुकीचे प्रमाणही जास्त आहे. या सर्व बाबींचा विचार करून एमएसआरडीसीने जुन्या महामार्गावर नऊ ठिकाणी उड्डाणपूल बांधण्याचा प्रस्ताव राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे पाठविला आहे. प्राधिकरण यासाठीचा निधी एमएसआरडीसीला देणार असून या प्रस्तावास मान्यता मिळाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.