पुणे – सध्या साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाला आहे. महामार्गांवरून ऊस वाहतूक करणारे ट्रक, ट्रॅक्टर-ट्रेलर, बैलगाडी अशा वाहनांचा वेग इतर वाहनांच्या तुलनेत अत्यंत कमी असतो. प्रवास करताना किंवा उभे असताना दृष्यमानता नसल्यास रस्त्याने प्रवास करणाऱ्या इतर वाहनांना त्यांचा अंदाज येत नाही, त्यामुळे ब्रेकिंग डिस्टन्स व स्टॉपिंग डिस्टन्स यांचा मेळ बसत नसल्यामुळे ट्रेलरला मागून धडक बसून अपघात होतात. हे टाळण्यासाठी वाहन मालकांनी महत्त्वपूर्ण उपाययोजना राबविणे तसेच त्याची जबाबदारी कारखान्यांचीही असणार आहे.
अपघात टाळण्यासाठी…
ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांचे अपघात हे विशेषतः रात्रीच्या वेळी घडतात. हिवाळा असल्याने धुक्यामुळे रात्रीची दृश्यमानता कमी असते, त्यामुळे अपघाताची शक्यता वाढते. यासाठी फ्लोरोसेंट रंगातील रिफ्लेक्टिव्ह पट्ट्या असलेले आच्छादन शेवटच्या ट्रेलरवर लावल्यास अपघातांना आळा बसू शकतो, याबाबत आरटीओने सूचना केली आहे.
कारखान्यांचीही जबाबदारी…
मोटार वाहन कायद्यानुसार वाहतूक नियमांच्या पालनाची जबाबदारी चालक, मालक यासोबतच ऊस भरणाऱ्या कारखान्यांची आहे. त्यामुळे त्यांनी वाहन चालकांकडे वैध गोष्टी आहेत का याची पाहणी करावी. साखर कारखान्यांनी त्यांच्याकडे येणाऱ्या ट्रेलरच्या वजनावरून ट्रेलरच्या अंतर्गत मोजमापानुसार क्षमतेपेक्षा जास्त माल होणार नाही, याची काळजी घ्यावी. ऊस भरण्याची कमाल उंची निश्चित करून द्यावी.
या उपाययोजनांची सूचना…
सुरक्षिततेच्यादृष्टीने ट्रॅक्टर चालकांनी पुढे व मागे रिफ्लेक्टिंग स्टीकर लावावे.
एकापेक्षा जास्त ट्रेलर जोडून उसाची वाहतूक करु नये.
ट्रॅक्टरची वेग मर्यादा, वाहने पाहण्यासाठी आरसे लावणे,
मोठ्या आवाजामध्ये म्युझिक सिस्टिम लावू नये.
ऊस वाहतूक करताना रस्त्याकडेला वाहने उभी करु नयेत.
वाहनांच्या क्षमतेबाहेर (ट्रेलरच्या दोन्ही बाजूच्या बाहेर) ऊस भरू नये.
वाहनाचे ब्रेक, इंडिकेटर, हॉर्न कार्यरत ठेवाव
सुरक्षित व विना अपघात वाहतूक या बाबींकडे विशेष लक्ष देत साखर कारखान्यांना सामाजिक बांधिलकीच्या नात्याने वाहन चालकांचे व मालकांचे सुरक्षित वाहतूक विषयक समाजप्रबोधन करावे. ऊसाची वाहतूक करणाऱ्या ट्रक, ट्रॅक्टर- ट्रेलर, बैलगाडी मालक व चालकांनी सुरक्षिततेच्यादृष्टीने खबरदारीचा उपाय योजना कराव्यात.
– डॉ. अजित शिंदे, प्रादेशिक परिवहन अधिकारी