सातारा – जागतिक वारसा स्थळाच्या यादीत नाव असणाऱ्या कास पुष्प पठारावरील तारेची संरक्षक जाळी जिल्हा प्रशासनाच्या वतीने गुरुवारी काढण्यात आली. गुरुवारी दिवसभर हे काम सुरू होते. कास पठार आता मोकळा श्वास घेणार असून त्याचा फायदा परागीकरण वाढवून फुलांच्या हंगामात दुर्मिळ फुलांच्या वाढीसाठी होणार असल्याचे मत पर्यावरणप्रेमी व्यक्त करीत आहेत.
जागतिक वारसा स्थळ कास पुष्प पठारावर दरवर्षी फुलांच्या हंगामात विविध रंगीत दुर्मिळ फुले फुलतात. फुलोत्सवाचा हा नजारा पाहण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो पर्यटक कास पठारावर येत असतात गेल्या काही वर्षापासून फुलणाऱ्या फुलांचे प्रमाण कमी होत असल्याचे चित्र दिसू लागले होते वन्य प्राणी गाय गुरे मुक्तपणे संचार करून शेणखत उपलब्ध झाल्यास तसेच या प्राण्यांचा वावर मुक्तपणे सर्वत्र पठारावर झाल्यास परागीकरण आणि त्याचा प्रसार होण्यास मदत होणार आहे.
त्यासाठी ही संरक्षक जाळी हटवली जावी, असे मत पर्यावरणप्रेमींनी अनेकदा व्यक्त केले होते. प्रसारमाध्यमांनी सुद्धा संरक्षक जाळीला पहिल्यापासून विरोध केला होता. जन्मताचा हा रेटा पाहून जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी वनविभागाच्या सहकार्याने ही जाळी हटवण्याच्या आदेश दिले आणि त्यानुसार पठारावर सुमारे सव्वा सातशे मीटरची जाळी घालण्यात आली होती ती काढण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली.”
यंदा फुलाचे प्रमाण अति पावसामुळे कमी असले तरी त्याला दुसरे कारण म्हणजे परागीकरणाची घटलेली प्रक्रिया परागीकरणाच्या या प्रक्रियेला आता कुंपण काढल्यानंतर गती मिळणार आहे, असे मत मानद वन्यजीव रक्षक सुनील भोईटे यांनी व्यक्त केले. या उपायोजनेमुळे कास पठाराला निश्चित फायदा होणार असून या पुढील फुलांच्या हंगामात फुलांचे फुलणारे प्रमाण अधिक प्रमाणात पाहायला मिळेल. फुलांच्या हंगामात वर्दळ वाढून फुलांची नुकसान होऊ नये यासाठी तात्पुरत्या स्वरूपात संरक्षक जाळीची सोय केली जाईल, असे सांगण्यात आले.
कास पठार समिती व वनविभागाच्या माध्यमातून संरक्षक जाळी लावण्यात आली होती. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार या जाळीचा दुष्परिणाम फुलांच्या हंगामावर होत असल्याने आजपासून जाळी काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. आता वन्य प्राण्यांसाठी पठार परिसर मोकळे होत असून पुढील फुलांचा हंगाम पूर्वीप्रमाणे येईल, अशी अपेक्षा आहे. हंगाम काळात फुलांच्या संरक्षणासाठी तात्पुरती जाळी उभारली जाईल मात्र फुलांच्या हंगामावर आम्ही कोणताही परिणाम होऊ देणार नाही, अशी स्पष्ट ग्वाही जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिली.