पुणे – राज्यप्राणी असलेला शेकरू, हरीण, सांबर, काळवीट यांसारख्या वन्यप्राण्यांसाठी संरक्षित असलेल्या जिल्ह्यातील अभयारण्यांना निसर्गप्रेमींची चांगलीच पसंती मिळत आहे. गेल्या वर्षभरात या अभयारण्यांना सुमारे 6 हजारांहून अधिक निसर्गप्रेमींनी भेट दिली असल्याची माहिती वनविभागाच्या नोंदींमधून समोर आली आहे.
वन्यप्राण्यांना हक्काचे निवासस्थान मिळावे, यासाठी वनविभागातर्फे 4 ठिकाणी वन्यप्राणी अभयारण्यांची निर्मिती केली आहे. यामध्ये भीमाशंकर, मयुरेश्वर, रेहकुरी आणि माळढोक अभयारण्यांचा समावेश आहे. येथे धोकादायक परिस्थितीत असणाऱ्या प्राण्यांसाठी संरक्षित वनक्षेत्र निर्माण केले आहे. या अभयारण्यांमध्ये शेकडो प्रकारच्या वनस्पती आणि प्राणी प्रजाती आढळतात. त्यामुळेच ही अभयारण्ये निसर्गप्रेमींसाठी अनोखी अनुभूती ठरते. यामध्ये विशेषत: हौशी पर्यटक, अभ्यासक, वन्यजीव फोटोग्राफर आणि विद्यार्थी यांचा समावेश आहे.
इतर अभयारण्यांच्या तुलनेत पुणे वनविभागाच्या अखत्यारितील अभयारण्यांमध्ये अभ्यासू पर्यटकांचे प्रमाण जास्त असते. विशेषत: भीमाशंकर अभयारण्यामध्ये पर्यटकांचे प्रमाण जास्त आहे. तीर्थक्षेत्र आणि निसर्गपर्यटन या दोन्हींचा लाभ घेता येत असल्याने हे प्रमाण जास्त असते. मात्र, इतर अभयारण्यांना भेटी देणाऱ्यांचे प्रमाणही तितकेच महत्त्वपूर्ण आहे.
– आर. के. वानखेडे, मुख्य वनसंरक्षक, वन्यजीव विभाग
अभयारण्यांनुसार पर्यटकांचे प्रमाण
भीमाशंकर अभयारण्य
2858
मयुरेश्वर अभयारण्य
2018
रेहकुरी काळवीट अभयारण्य
1048
माळढोक पक्षी अभयारण्य
274