वाघोली – पालकमंत्री गिरीश बापट यांच्या माध्यमातून “पीएमआरडीए’कडून वाघोली (ता. हवेली) येथील भैरवनाथ तलावाच्या आरसीसी भिंतीच्या बांधकामासाठी 3 कोटी 99 लाख मंजूर करण्यात आल्याची माहिती शिरूर हवेलीचे आमदार बाबूराव पाचर्णे यांनी दिली.
आमदार पाचर्णे म्हणाले की, शिवकालीन भैरवनाथ तळ्याचे खोलीकरण व सुशोभीकरण करण्याची मागणी वाघोली ग्रामस्थांनी सातत्याने पालकमंत्री गिरीश बापट व पीएमआरडीए यांच्याकडे केली होती. पाण्याची टंचाई मोठ्या प्रमात भासत आहे. त्यासाठी जलनियोजन करणे हे महत्वाचे होते. त्यादृष्टीने तळ्याचे काम “पीएमआरडीए’ व ग्रामपंचायतीमार्फत मोठ्या प्रमाणात प्रगतीपथावर आहे.
भैरवनाथ तलाव हे साधारण 35 एकरचे आहे. त्याचे खोलीकरण मोठ्या प्रमाणात केले आहे. साधारण दुष्काळ जरी पडला तरी देखील गावाला पाणी 2 ते 3 वर्ष पुरेल एवढी क्षमता आता वाढली आहे. त्यामुळे गावातील संपूर्ण बोअरवेल व विहिरींना कायमस्वरूपी पाणी असेल. त्यामध्ये 3.5 किलोमीटरचा जॉगिंग ट्रॅक, मातीचा ट्रॅक, हार्ड ट्रॅक, तर ओपन जिम, तालीम, 3 ते 4 गार्डन, वॉटर स्पोर्ट, बोटिंग, वाचनालय व संपूर्ण तलावाला तारेचे कंपाउंड असणार आहे. चारीबाजूनी वृक्षारोपण करण्यात येणार आहे.
हे काम साधारण दीड महिन्यापासून सुरू आहे. हे काम होण्यासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ दाभाडे, जिल्हा परिषदेचे सदस्य माऊली कटके, सरपंच वसुंधरा उबाळे, उपसरपंच मारुती गाडे, माजी उपसरपंच रामकृष्ण सातव पाटील, भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे सरचिटणीस अनिल सातव, भारतीय जनता पक्षाचे हवेलीचे उपाध्यक्ष समीर भाडळे यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकारी ग्रामस्थ प्रयत्न करीत आहेत. कोल्हापूर येथील रंकाळा तलावाप्रमाणे भैरवनाथ तलावाचे काम करण्यात येत आहे. लवकरच वाघोलीतील ऐतिहासिक व निसर्गरम्य तलाव सर्वाना पाहता येणार आहे.
आमदार पाचर्णे यांच्या प्रयत्नातून जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनी वाघोली पाणीपुरवठा योजनेचे पाणी आरक्षण मंजूर केले आहे. यासाठी वढू खुर्द येथील बंधाऱ्यातून 1.49 दलघमी 46.43 टक्के पाणी साठ्यास मान्यता दिली आहे. आमदार पाचर्णे यांच्या प्रयत्नातून वाघोली पाणीपुरवठा योजनेस 23 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. लवकरच कामास सुरुवात होणार असल्याचे माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ दाभाडे यांनी सांगितले.