पुणे : ‘अपने अपने राम’ रामकथा सांगता करताना रामकथाकार डॉ. कुमार विश्वास, माजी महापौर व भाजपा प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, ह.भ.प. पंकज महाराज गावडे आदी.
पुणे – प्रभू श्रीराम मानवतेचे, माता सीता शांतीचे आणि वीर हनुमान ज्ञानाचे, शक्तीचे प्रतीक आहेत. प्रभूच्या चरणी समर्पित ज्ञानालाच शांततेचा शोध घेता येईल. ज्याच्यामध्ये शक्ती व विनम्रता आहे, तोच रामाच्या वंशाचा किंवा त्याचा शिष्य असू शकतो, असे मत प्रसिद्ध रामकथाकार डॉ. कुमार विश्वास यांनी व्यक्त केले.
अयोध्येतील श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर संस्कृती प्रतिष्ठान आणि शिक्षण प्रसारक मंडळीतर्फे (शि. प्र.) आयोजित डॉ. कुमार विश्वास यांच्या अमोघ वाणीतील ‘अपने अपने राम’ या तीन दिवसीय रामकथेची सांगता गंगा आरतीने झाली. यावेळी संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक, माजी महापौर व भाजपा प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, ह.भ.प. पंकज महाराज गावडे उपस्थित होते.
रामकथेच्या सांगता सत्रात बोलताना डॉ. कुमार विश्वास म्हणाले की, रामकथा ही मानवतेच्या कल्याणासाठी ‘बूस्टर’ आहे.
कठीण प्रसंगातून मार्ग कसा काढावा, याची शिकवण रामायण देते. जेव्हा जग प्रतिकूलतेशी संघर्ष करत असेल, निराशेच्या वातावरणात जगत असेल, तेव्हा सूर्यवंशी भगवान राम मार्ग दाखवत राहातात. प्रभू श्रीराम अशी देवता आहे, जे दुःखापासून दूर जाण्याची कल्पना देण्याऐवजी कठीण परिस्थितीमध्ये कुशलतापूर्वक मार्ग काढण्याचे प्रेरणा देतात. राक्षसांचा वध प्रभू श्रीरामांना असाही करता आला असता, पण आयुष्याच्या वाटेवर संकटांचा, संघर्षाचा सामना करून त्यावर विजय मिळवण्याची प्रेरणा वनवासात गेलेले राम देतात.
यावेळी मुरलीधर मोहोळ यांनी डॉ. कुमार विश्वास यांना छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा देत त्यांचा कृतज्ञापूर्वक गौरव केला. पंकज महाराज गावडे यांनी जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची पगडी, तुळशीहार घालून डॉ. विश्वास यांना सन्मानित केले. ‘सियावर रामचंद्र की जय’, ‘जय श्रीराम’, ‘पवनसुत हनुमान की जय’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा उद्घोषाने परिसर दुमदुमून गेला. मोबाईलचा टॉर्च लावत डॉ. विश्वास यांच्यासोबत ‘चलो लौट चले रघुराई’ हे भजन गाताना परिसरात चैतन्य संचारले होते. हिमांशू पांडे व सहकाऱ्यांनी म्हटलेल्या गंगा आरतीने सांगता झाली.