मार्केट यार्ड -शिवनेरी रस्त्याची मालकी कृषी उत्पन्न बाजार समितीची असून गेली अनेक वर्षांपासून रस्त्याची देखभाल पुणे महापालिकेकडून करण्यात येते. पदपथावर होणारे अनधिकृत विक्रेत्यांचे अतिक्रमण थांबविण्यासाठी बाजार समितीकडून जालीम उपाय राबविण्यात आला असून पदपथ चक्क लोखंडी जाळ्याने बंद करून ती जागा पार्किंगसाठी भाडेतत्वावर देण्यात आली आहे. पदपथ बंद केल्याने नागरिकांना रस्त्यावरून चालावे लागत आहे. तालेरा गार्डन, मनोज सोसायटी या भागातील पदपथ पादचाऱ्यांसाठी पूर्णतः बंद करण्यात आले आहेत.
शिवनेरी रस्त्यावर पे ऍन्ड पार्क पद्धत सुरू केल्यापासून अनेक नागरिक व व्यापारी क्षेत्रीय कार्यालयात जाऊन तक्रारी करीत आहेत. मात्र, हतबल महापालिकेकडून याबाबत कुठलीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. याउलट बंद केलेले पदपथ सुरू करण्यासाठी बाजार समितीकडे पत्रांद्वारे विनवणी करून जाळी काढण्याची मागणी केली जात आहे, पालिकेच्या या केविलवाणी कार्यपद्धतीवर नागरिक रोष व्यक्त केला आहे.
शहर तसेच उपनगर परिसरातील मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांवरील पदपथ अनधिकृत हातगाड्यांमुळे बंदच आहेत की अशी उलट “अभ्यासू’ प्रतिक्रिया बाजार समितीकडून देण्यात येत आहे. पदपथ बंदिस्त करून ते भाडेतत्वावर देणे ही नवीन पद्धत प्रचलित करणे म्हणजे आजारा पेक्षा ईलाज भयंकर, अशीच पद्धत अवलंबली आहे.
शिवनेरी रस्त्यावर अनेक जागी पदपथावर काही कुटुंबे राहतात, अतिक्रमण करतात त्यामुळे पदपथ बंदिस्त केला आहे. पदपथावर पार्किंग केल्यामुळे तेथे अतिक्रमण होणार नाही व तेथे पार्कींगच्या बाजूला थोडा भाग नागरिकांना चालण्यास ठेवला आहे तेथून नागरिकांना चालता येईल.
– मधुकांत गरड, प्रशासक, कृषी उत्पन्न बाजार समिती
बाजार समितीने या परिसरसातील रस्त्यांवरील पदपथ बंदिस्त करून सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची पायमल्ली चालली आहे. पदपथ हे फक्त पादचाऱ्यांसाठीच असले पाहिजेत, असा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे. मनमानी करणाऱ्या अधिकाऱ्यांना कोठे तरी लगाम बसावा. यासाठी आंदोलन करणार आहे, याची दखल घ्यावी.
– बाळासाहेब रुणवाल, सामाजिक कार्यकर्ता
महापालिकेच्या रस्ते विभागाने पदपथ हा पादचाऱ्यांना चालण्यासाठी असतो. पदपथ भाडेतत्वावर देता येत नाहीत. सदर रस्त्याची देखभाल पुणे महापालिका करीत असेल तर कृषी उत्पन्न बाजार समितीने पदपथ लोखंडी जाळ्या लावून परस्पर बंदिस्त करून भाड्याने देणे हा गुन्हा आहे.
– विजय कुंभार, राज्य संघटक, आम आदमी पक्ष
.
कृषी उत्पन्न बाजार समितीकडून शेतकरी हिताची कामे करणे बाजूला ठेवून नको त्या कामात लक्ष देत आहे. शिवनेरी रस्त्यावर शेतकरी, व्यापारी, सामान्य नागरिक यांच्याकडून अरेरावी करून चुकीच्या पद्धतीने पार्कींगची वसुली करण्याची नवी पद्धत सुरू झाली आहे, त्यास आमचा विरोध आहे.
– प्रवीण चोरबेले, माजी अध्यक्ष, पुणे मर्चंट चेंबर
पुणे महापालिकेतर्फे कालच कृषी उत्पन्न बाजार समितीला पत्र देण्यात आले असून जाळी लावून बंदिस्त केलेल्या पदपथामुळे अपघात होण्याची शक्यता आहे, असे वर्तविण्यात आले आहे तसेच जाळी काढून पदपथ मोकळे करण्यास सांगण्यात आले आहे. याबाबतची अमलबजावणी होईल.
– अमर शिंदे, कार्यकारी अभियंता, पथविभाग पुणे महापालिका