पुणे – करोना प्रादुर्भावाच्या दोन वर्षांच्या काळात पदांची भरती होऊ शकली नाही. सद्यस्थितीत विविध शासकीय विभागांत 2 लाख 3 हजार 303 पदे रिक्त असल्याची माहिती विधानसभेत राज्य सरकारकडून देण्यात आली आहे. यापैकी येत्या सहा महिन्यांत सुमारे 8 हजार पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यावरून 1 लाख 95 हजार पदे रिक्तच राहणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
विधानसभेत राहुल कुल, जयकुमार गोरे, प्रकाश आबिटकर आदी सदस्यांनी शासकीय पदांच्या भरतीसंदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर राज्य शासनाकडून सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सविस्तर माहिती सभागृहात दिली. विविध शासकीय विभागांसाठी एकूण 11 लाख 53 हजार 42 पदे मंजूर आहेत. त्यातील 8 लाख 77 हजार 40 पदे भरलेली आहेत. गृह, आरोग्य आदी विभागांना देखील पद भरतीची परवानगी दिली असून भरती प्रक्रिया ताबडतोब राबवली जाणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
शासकीय नोकऱ्यांमध्ये सरळसेवेच्या कोट्यातील भरती प्रक्रिया करण्यासाठी विविध विभागांकडून 15 हजार 390 पदांचे मागणीपत्र प्राप्त झाले आहे. त्यातील 7366 पदांची मागणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे केली आहे. या सहा महिन्यात साधारणतः 6 हजार 200 पदांकरिता 300 जाहिराती प्रसिद्ध झाल्या असून लवकरच एक हजार 700 पदांसाठी जाहिराती प्रसिद्ध करुन भरती प्रक्रिया राज्य शासनाकडून राबविण्यात येणार आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना दिलासा मिळणार आहे.
हजारो उमेदवार प्रतीक्षेत
राज्य शासनाच्या अनेक विभागात जवळपास 40 टक्क्यांहून पदे रिक्त आहेत. त्यामुळे कमी मनुष्यबळात शासकीय कामे पूर्ण करावी लागत आहे. याउलट स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे उमेदवार पदभरतीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यात मागील दोन वर्षात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून कोणतीची पदभरती प्रक्रिया राबविण्यात आली नाही. त्यामुळे राज्य शासनाने तातडीने रिक्त पदाची भरतीप्रक्रिया राबवावी, अशी मागणी उमेदवारांकडून होत आहे.