पुणे – शहराच्या पाणी वापर नियंत्रित करायचा असल्यास महापालिकेने शहरात स्वतंत्र घरे, व्यावसायिक मिळकती तसेच सोसायटयांना बसविण्यात आलेल्या मीटरनुसार पाणीपट्टी आकारणीस मान्यता द्यावी अशी मागणी महापालिकेने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली होती. या मागणीस शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने विरोध केला असून तसेच हा निर्णय घेतल्यास पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा महापालिकेचे शिवसेनाचे माजी गटनेते ( ठाकरे गट) पृथ्वीराज सुतार यांनी दिला आहे.
सुतार म्हणाले की ही पाणीपुरवठयाची फसवी योजना पुणे शहरामध्ये मनपाने राबविली आहे. याचा डीपीआर मुख्य सभेने जो मान्य केला त्याप्रमाणे या योजनेचे लाभ प्रत्यक्षात सुरू नाही. मनपाच्या व अधिकाऱ्यांच्या चुकीच्या निर्णयामुळे मनपाला आर्थिक भुर्दंड बसला असून, सदरचे पैसे हे पुणेकरांच्या कररूपी पैशातून दिले जात आहेत.,ही योजना फक्त काही लोकाच्या फायदयासाठी राबविण्यात येत आहे. ही योजना प्रकल्प आराखडयापासून ते निविदा प्रक्रियेपर्यंत वेगवेगळया कारणामुळे लांबली गेली. या योजनेमध्ये काही तांत्रिक बदल करणे आवश्यक आहे. ज्यामुळे ह्या प्रकल्प खर्चामध्ये बचत होऊन मनपाची आर्थिक बचत होणार आहे तसेच जर हे तांत्रिक बदल केले नाहीत तर या योजनेचा पुणेकरांना हवा तसा फायदा होणार नसल्याचे सुतार यांनी स्पष्ट केले.
तसेच जोपर्यंत पुणे शहरातील सर्व भागातील सर्व नागरिकांना चोवीस तास समान पाणी या मूळ योजनेप्रमाणे 24 तास पाणीपुरवठा होत नाही, तोपर्यंत मीटर प्रमाणे पाण्याचे बील देऊ नये जर प्रशासनाने पुणेकरांना वेठीस धरले तर ” शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) ही आपल्या पध्दतीने पुणेकरासह तीव्र आंदोलन करील व त्याची सपूर्ण जबाबदारी महापालिका प्रशासनाची राहिल असा इशाराही पक्षाच्या वतीने सुतार यांनी दिला आहे.