पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – नरेंद्र मोदी वगळता यापूर्वीच्या सर्व पंतप्रधानांनी विरोधकांचा सन्मान केला. लोकशाहीत विरोधकांना महत्व आहे आणि मोदी सांगतात एकाही विरोधकांना निवडून देऊ नका. मोदी पंतप्रधान पदाची कितपत प्रतिष्ठा राखतात, हा प्रश्नच पडतो आहे, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी लगावला आहे.
पुण्यात पत्रकार परिषद घेत शरद पवार यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. राज ठाकरेंसदर्भात प्रश्न विचारला असता शरद पवार म्हणाले की, आतापर्यंत राज ठाकरेंनी तीन चार निर्णय गेल्या १० ते १५ वर्षांत घेतले होते. त्यांनी कसलीही अपेक्षा न ठेवता पाठिंबा दिला आहे असे ते म्हणतात मात्र येत्या दोन चार दिवसांत याबाबत चित्र स्पष्ट होईल.
राज ठाकरेंनी अनेकदा भाजपसंदर्भात कठोर शब्द वापरले तर, काही वेळा त्यांना पाठिंबा दिला आहे. पत्रकारांनी राज ठाकरेंच्या भूमिकेचा अन्वयार्थ काय लावता, असा प्रश्न विचारला असता पवार यांनी मी काय अन्वयार्थ लावणार. असे उत्तर दिले. पत्रकारांनी राज ठाकरेंची भूमिका सामान्य माणसांना कळली नाही, असे म्हणत तुम्हाला तरी राज ठाकरे कळले का? असा प्रश्न विचारला यावर पवारांनी मी पण सामान्य नागरिक आहे, असे म्हटले.
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी विरोधी महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांच्यावर दत्तक प्रकरणावरुन टीका केली. शरद पवारांनी मंडलिकांच्या टीकेला उत्तर दिले. संजय मंडलिक काय म्हणाले हे नेमके माहिती नाही.
राजघराण्यात दत्तक ही गोष्ट नवी नाही. अनेकजण अशा पद्धतीने राजे झालेत. एकदा दत्तक घेतल्यानंतर तो त्या घराण्याच्या कुटुंबाचा प्रतिनिधी होतो. आज ज्यांच्याबद्दल अशा प्रकारची विधान केली जातात. याचा अर्थ किती खालच्या स्तरावर विरोधक जातात त्याचे हे उत्तम उदाहरण असल्याचे पवार यांनी सांगितले.
एकनाथ खडसे यांच्या बाबत टोकाची भूमिका सत्ताधाऱ्यांनी घेतली. त्यांच्या काही प्रकरणात चौकशा सुरु केल्या. यातना सहन करण्याची वेळ त्यांच्यावर आली. ते हतबल झाले होते. त्यामुळे त्यांना रिलीफ मिळत असेल त्याठिकाणी त्यांनी जावे, अशी आमची भूमिका होती, असेही पवार यांनी स्पष्ट केले आहे.
धैर्यशील मोहिते पाटीलांचा दोन दिवसात प्रवेश होणार
खेड तालुका भाजप समन्वयक अतुल देशमुख यांनी काही समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. त्यांचे स्वागत केले. माढयातील भाजप नेते धैर्यशील मोहिते पाटील यांनी भेट घेत चर्चाही केली.
ते येत्या दोन दिवसांत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार आहेत. पुणे जिल्ह्याचे भाजपचे माजी अध्यक्ष नामदेव ताकवणे हे देखील प्रवेश करणार आहेत. या सगळ्यांनी प्रवेशासाठी कोणतीही अट किंवा अपेक्षा ठेवलेली नाही, असे शरद पवार यांनी सांगितले आहे.
स्वाभिमानाला धक्का बसल्यानेच भाजपमधून बाहेर….
गेल्या १० वर्षांत भाजपचे काम करत असताना पक्ष वाढविण्याचे काम केले. मात्र अपमानास्पद वागणूक मिळाली. गेल्या काही वर्षात स्वाभिमानाला धक्का बसला. सर्व सामान्यांची काम होत नसतील आणि स्वाभिमानाने राहायचे असेल तर एकच नाव समोर आले ते म्हणजे शरद पवारांचे. त्यामुळे शरद पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला, असे अतुल देशमुख यांनी सांगितले.