पुणे – महापालिकेकडून मंजूर करण्यात आलेल्या पाणी कोट्यापेक्षा अधिक पाणी वापरले जात असल्याने उन्हाळ्यात शहराचे पाणीकपात करण्याचा इशारा जलसंपदा विभागाकडून महापालिकेस देण्यात आला आहे. त्याची गंभीर दखल घेत महापालिका प्रशासनाने अखेर शहराचा पाणीवापर कमी करण्याचा निर्णय घेतला असून त्याबाबतचा प्रस्ताव पाणी पुरवठा विभागाने महापालिका आयुक्तांच्या मान्यतेसाठी ठेवला आहे. त्यानुसार, प्रत्येक 15 दिवसांतून एकदा पाणी कपात प्रस्तावित करण्यात आली आहे. महापालिका निवडणुकांच्या तोंडावर ही कपात केल्यास त्याला राजकीय विरोध होण्याची शक्यता असल्याने हा निर्णय घेण्यापूर्वी पक्षनेत्यांशी चर्चा करण्यात यावी, असेही पाणी पुरवठा विभागाने ठेवलेल्या प्रस्तावात नमूद केले आहे.
कालवा समितीच्या बैठकीत पाणी वापर कमी करण्याचे निर्देश महापालिकेस देण्यात आले आहेत. त्यानंतरही महापालिका खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी उचलत आहे. त्याचा उन्हाळ्यातील पाणी नियोजनावर परिणाम होणार आहे. त्यामुळे महापालिकेने आतापासूनच पाणी वापर कमी करावा, अन्यथा उन्हाळ्यात पाणी कमी पडल्यास त्यास महापालिका जबाबदार असेल असे पत्र दिवाळीपूर्वी पाटबंधारे विभागाने महापालिकेस दिले होते. त्यानुसार, 21-22 या वर्षासाठी भामा आसखेड धरणातून दैनंदिन 200 एमएलडी पाणीवापर गृहीत धरून महापालिकेस 10.99 टीएमसी पाणी निर्धारित केले जाणार आहे.
त्यामुळे उर्वरित पाणी सिंचनासाठी असणार आहे. मात्र, प्रत्यक्षात महापालिका दोन्ही धरणांतून दैनंदिन स्वरूपात घेत असलेले पाणी पाहता हा पाणी वापर सुमारे 15 ते 17 टीएमसीपर्यंत जात आहे.
निवडणुकीत पाणी पेटणार?
दरम्यान, ऐन महापालिका निवडणुकांच्या तोंडावर पालिका प्रशासनाचा हा प्रस्ताव निवडणुकीत पाणी पेटविणार आहे. निवडणुकांच्या तोंडावर हा निर्णय घेण्याची जबाबदारी सत्ताधारी भाजपवर असणार आहे. त्याच वेळी विरोधकांकडून ऐन निवडणुकीच्या तोंडावर प्रशासनाच्या भूमिकेवर लक्ष ठेवत भाजपला अडचणीत आणण्याची खेळी केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर शहरातील पाणीप्रश्न पेटणार आहे.