पुणे (सत्यवान सुरळकर)- खरं तर पत्रकार व्हायचं स्वप्नं… लिहिण्याचा बाजही उत्तम… गडकोट मोहिमा आणि ट्रेकिंगची मनस्वी आवड…ढोलताशा पथकातून वाढलेली आणि उपजत असणारी सामाजिक जाण… या साऱ्या प्रियमच्या आठवणी… “प्रभात’ परिवारातील अनेकांच्या मनात घर केलेल्या…
गहुंजेजवळ मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर शनिवारी झालेल्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला. यात प्रियम राठी ही “प्रभात’ परिवारातील सदस्य असलेले लेखक सत्येंद्र राठी यांच्या कन्येचा समावेश होता. तिच्या अकाली मृत्यूच्या बातमीने “प्रभात’ परिवारावरही राठी परिवाराप्रमाणेच दु:खाचा डोंगर कोसळला.
प्रियम “प्रभात’ कार्यालयात तिच्या बाबांचे लेख आणून देण्यासाठी येत असे. तिच्या नितळ आणि मनमिळावू स्वभावामुळे तिने सर्वांच्या मनात एक आपलेपणाची भावना निर्माण केली. “मास कम्युनिकेशन’च्या पहिल्या वर्गात शिकणाऱ्या प्रियमचे नामवंत पत्रकार होण्याचे स्वप्न; पण ते अधुरेच राहणार असल्याची खंत सर्व जण व्यक्त करत होते. प्रियमचे बाबा सत्येंद्र राठी हे गेली अनेक वर्षे “प्रभात’मध्ये रूपगंध पुरवणीसाठी प्रेरणात्मक, सांस्कृतिक आणि अनुभवपर कथन लिहितात. या लेखांत अधूनमधून प्रियमच्या अनुभवांचाही समावेश असे. तिची गडकिल्ल्यांची भ्रमंती, ढोलताशा पथकाचा अनुभव, विपश्यना केंद्रातील आठवणी बाबांनी लिहिल्या. त्या वाचून प्रियम कार्यालयात येण्याआधीच “प्रभात’ परिवारातील एक सदस्य होऊन गेली. थोडक्यात, तिच्या स्मृती “रुपगंध’च्या रूपाने एका अर्थाने “प्रभात’ने जतनही केल्या.
मागील वर्षी गणपती उत्सवानिमित्त प्रियम हिच्याबाबत घडलेल्या एका प्रसंगावर दैनिक “प्रभात’च्या रविवारच्या अंकात रूपगंध पुरवणीमध्ये एक लेख छापण्यात आला होता. प्रियम सात-आठ वर्षांची असताना तिने गणपतीची मूर्ती आगाऊ बूक केली होती आणि नंतर ती बालसुलभपणे विसरूनही गेली. ऐन चतुर्थीला तिला ते अचानक आठवले. तिने घरी सांगितले. त्यामुळे तिच्या घराच्यांची जी पळापळ झाली ती घडलेली घटना गमतीशीर होती. शिवाय कोणत्या विक्रेत्याकडे गणपती बूक केला हे तिला काही आठवत नव्हते. त्यामुळे ती व तिचे वडील घराजवळील जवळपास सर्व स्टॉल शोधत होते. शेवटी तो स्टॉल सापडला. जो गणपती बूक केला होता तो प्रियमने आनंदाने उड्या मारून पटकन उचलून डोक्यावर घेतला. स्टॉलवाल्या व्यक्तीने प्रियमने बुकिंग केलेला गणपती कुणालाही विकला नव्हता, हे विशेष. याचे कारण तिच्या वडिलांनी विचारले असता, ती व्यक्ती म्हणाली की, “इतकी गोड, चुणचुणीत छोकरी कोण विसणार, ती आज येणार… उद्या येणार म्हणून मी हा गणपती तिच्यासाठी राखून ठेवला.’ या आठवणी केवळ राठी परिवारातच नव्हे तर “प्रभात’ परिवाराच्याही स्मरणात कायम राहतील…